मुंबई (वृत्तसंस्था) तुम्ही कोणीही माझं काहीही करू शकत नाही. तुमच्या कोणत्याही प्रतिक्रियेला मी घाबरत नाही. तुम्हा सर्वांना मी आतापर्यंत पुरुन उरलो आहे. त्यामुळे त्यांना जे काही करायचं ते करु दे, अशी भूमिका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज एका पत्रकार परिषदेत मांडली. तसेच जनआशीर्वाद यात्रा सुरुच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत नारायण राणे यांनी आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर २४ ऑगस्टला त्यांना अटक करण्यात आली होती. २४ ऑगस्टला रात्री उशिरा त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर राज्याच्या राजकारणात जोरदार पडसाद उमटू लागले आहेत. शिवसेना भाजपामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत उत्तरं दिली. २७ ऑगस्टपासून जन आशीर्वाद यात्रेला पुन्हा सुरुवात होईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. नारायण राणे यांना १७ सप्टेंबरपर्यंत दिलासा मिळाला आहे. पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कारवाई करणार नाही अशी ग्वाही सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे.
जनआशीर्वाद यात्रा यापुढेही सुरूच राहील
गेल्या काही दिवसांपासून माझी जनआशीर्वाद यात्रा सुरु होती. काहीजण माझ्या मैत्रीचा फायदा उचलतात हेदेखील माझ्या लक्षात आलं आहे. ही जनआशीर्वाद यात्रा पंतप्रधानांना ७ वर्ष झाली. या कालावधीत केंद्राने आणलेल्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवणं यासाठी ही यात्रा काढली होती. देशाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात मला कॅबिनेट मंत्री म्हणून घेतलं. सर्व नवनियुक्त मंत्र्यांना राज्यात जाऊन जनतेची आशीर्वाद मागून खात्यातील कामकाजाला सुरुवात करा अशी सूचना पंतप्रधानांनी दिली होती. १९ ऑगस्टपासून माझ्या जनआशीर्वादाला यात्रेला सुरुवात झाली. दोन दिवस खंड पडला आहे. पुन्हा जनआशीर्वाद यात्रा पुढे सुरुच राहील असं राणेंनी सांगितले.
पवार साहेब, मुख्यमंत्री केलंत त्याचा सुसंस्कृतपणा बघा
“मी असं काय बोललो होतो की राग आला. ते वाक्य काय मी परत बोलणार नाही. कोर्टाचा निकाल येईपर्यंत बोलणार नाही. भुतकाळामध्ये एखादी गोष्ट घडली आणि त्याची माहिती दिली. तो कसा गुन्हा होतो.” असा प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केला. ” ज्यांना देशाबद्दल अभिमान नसतो. त्यांना राष्ट्रीय सण माहिती नसतात. देशाबद्दल अभिमान आहे म्हणून सहन झालं नाही. म्हणून जे आज बोललो ते रेकॉर्डवर आहे.” असं स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिलं. “सेना भवनबद्दल अशी कोण भाषा करेल त्याचं थोबडं तोडा. आदेश दिले. हा क्राईम नाही. कलम १२० अंतर्गत गुन्हा होत नाही.”, असा प्रश्नही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानाबाबत उपस्थित केला. “हा योगी आहे की, ढोंगी चपल्लांनी मारले पाहीजे. पवार साहेब, मुख्यमंत्री केलंत त्याचा सुसंस्कृतपणा बघा. एका मुख्यमंत्र्याला बोलतात चप्पलाने मारला पाहीजे.” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचाही नारायण राणे यांनी समाचार घेतला. “माननीय शरद पवार साहेब काय सज्जनपणा आहे. एवढं चांगलं करणाऱ्याला त्यांनी मुख्यमंत्री केली. तर त्यांनी चुकीचं केलं असं मला नाही वाटत. काय भाषा आहे. आम्ही तर राष्ट्राबद्दल अज्ञान दाखवलं म्हणून आम्ही बोललो. कोणी यापुढे असं बोलू नये म्हणून आम्ही बोललो.”, असा टोला नारायण राणे यांनी शरद पवार यांना हाणला.