जळगाव (प्रतिनिधी) गृहमंत्री अमित शाह यांना सव्वा वर्षांनी शुद्ध आली. याचा मला आनंद आहे, अशा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी अमित शाह यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत. जिल्ह्यातील पाळधी येथे एका लग्नसोहळ्याला ना. पाटील हे उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधत शाह यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं.
यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकरी आंदोलनाबाबत सेलेब्रिटिंनी केलेल्या ट्विटचा देखील समाचार घेतला. यावर पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने आंदोलन केले पाहिजे, यावर सेलिब्रिटिंनी आता कुठे शुद्ध आली आहे. शेतकरी गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईतील आझाद मैदानापासून ते दिल्लीपर्यंत आंदोलन करत आहेत.
भाजपाचे राष्ट्रीय नेते अमित शाह हे दोन दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी शिवसेनेवर कडाडून टीका केली होती. शिवसेनेने युतीधर्म पाळला नाही. जनादेशाचा अनादर करत सत्तेसाठी शिवसेना विरोधी पक्षांसोबत गेल्याचे शाह म्हणाले होते. शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना गुलाबराव पाटील यांनी अमित शाह यांना सव्वा वर्षांनी शुद्ध आली, याचा मला आनंद असल्याचे म्हटले आहे.