नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे पंतप्रधान झाल्यास देशातील धार्मिक एकता धोक्यात येईल. अशी भीती प्रसिद्ध लेखक आणि इतिहासतज्ञ रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केलं आहे. गुहा यांनी टेलिग्राफ इंडियासाठी लिहिलेल्या एका लेखामध्ये योगी आदित्यनाथ देशाचे पंतप्रधान झाल्यास काय होईल यासंदर्भात भाष्य केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर सध्याचे गृहमंत्री अमित शाह हे पंतप्रधान पदाचा दावेदार असण्याची शक्यता कमी असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे पंतप्रधानपदी विराजमान होण्याची अधिक शक्यता असल्याचे मत प्रसिद्ध लेखक आणि इतिहासतज्ञ रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केलं आहे. गुहा यांनी टेलिग्राफ इंडियासाठी लिहिलेल्या एका लेखामध्ये योगी आदित्यनाथ देशाचे पंतप्रधान झाल्यास काय होईल यासंदर्भात भाष्य केलं आहे. या लेखामध्ये गुहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सध्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी असणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्यामधील साम्य आणि फरक यावर बोलताना मोदींपेक्षा योगींचे नेतृत्व देशातील सामाजिक एकता बिघडवण्याचं काम करेल अशी भीती व्यक्त केली आहे.
रामचंद्र गुहा यांनी, वेटींग इन विंग्स म्हणजेच भरारी घेण्यास तयार असणारा पक्षी अशा अर्थाचा एक लेख लिहिला असून यामध्ये त्यांनी योगी पंतप्रधान झाल्यास देशातील धार्मिक एकताही धोक्यात येईल असं म्हटलं आहे. लेखाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय असणारे अमित शाह हे मोदींचे वारसदार होऊन पंतप्रधानपदाची गादी संभाळतील असं २०१९ पर्यंत सर्वांनाच वाटत होतं असं नमुद केलं आहे. मात्र २०२० च्या शेवट होईपर्यंत योगी आदित्यनाथ हे अधिक जोमाने पुढे आले असून धार्मिक मुद्द्यांसंदर्भातील त्यांच्या धोरणांंची अंमलबाजवणी कर्नाटक आणि मध्य प्रदेशसारख्या भाजपाची सत्ता असणाऱ्या राज्यातील मुख्यमंत्र्याकडूनही नवीन कायदा लागू करुन केली जात आहे. हे एकप्रकारे योगी आदित्यनाथ यांचं नेतृत्व येडियुरप्पा आणि शिवराज सिंह चौहान यांच्यासारख्या नेत्यांनी मान्य केल्यासारखं असल्याचं मत गुहा यांनी व्यक्त केलं आहे. राजकारणामध्ये टीकून राहण्यासाठी योगींप्रमाणेच टोकाचं राजकारण करणं काळाची गरज असल्याचं या नेत्यांना कळालं आहे, असंही या लेखात म्हटलं आहे.
याच लेखामध्ये मोदी आणि योगीमध्ये फरकही असल्याचं गुहा यांनी म्हटलं आहे. मोदी किमान सबका साथ सबका विकास असं म्हणतात, मेट्रोत एखाद्या मुस्लिमासोबत फोटो तरी काढतात. मात्र योगी असलं काही करत नाहीत. हिंदू हे इतर कोणत्याही धर्मावर श्रद्धा असणाऱ्या आणि खास करुन मुस्लीमांपेक्षा वरचढ आहेत असं योगी समजतात, असा उल्लेख या लेखात आहे. योगी यांनी हिंदू युवा वाहिनी नावाची संघटना स्थापन केली असून हिंका, दंगल आणि इतर प्रकरणांमध्ये या संघटनेविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. आज योगी मुख्यमंत्री झाल्यानंतरही ही संघटना कार्यरत आहे, असं गुहा यांनी म्हटलं आहे. अशाप्रकारे एखादी हिंदुत्वावादी संघटना स्थापन करुन मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचलेले योगी एकमेव नेते असल्याचं गुहा सांगतात.
देशामध्ये अधिक शक्तीशाली होणं हेच योगींच एकमेव ध्येय
पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी जगभारतील अनेक देशांमध्ये दौरे करुन तेथील नेत्यांना भारताकडे आर्षित करण्याचा प्रयत्न केला. यात त्यांना संमिश्र यश मिळालं. मात्र योगी अदित्यनाथ पंतप्रधान झालेत तर जगातील इतर देश त्यांच्याबद्दल आणि भारताबद्दल काय विचार करतात याबद्दल त्यांना फारशी चिंता नसेल. देशामध्ये आपण अधिक शक्तीशाली होणं हेच त्यांचं एकमेव ध्येय असेल. खास करुन राजकीय, वैचारिक आणि धार्मिक मतांशी आपल्याशी सहमत नसणाऱ्यांविरोधात शक्तीप्रदर्शन करण्याचा त्यांचा विचार असेल असं गुहा म्हणतात.