पंढरपूर (वृत्तसंस्था) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील त्यावेळेस संयमाने वागले असते तर शिवसेनेचे ५६ आमदार आज भाजपसोबत दिसले असते, अशी टीका शिवसेना नेते आणि पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केली आहे. तसेच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर टीका करणे म्हणजे उंदराने काहीतरी चिंधी पकडणे, असंही ते म्हणाले.
ना. गुलाबराव पाटील यांनी आज श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. त्यानंतर पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. कोरोनाचे संकट कमी झाल आहे. आता कायमस्वरूपी हे कोरोनाचे संकट दूर कर, असे साकडे ना. पाटील यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी घातले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सतत काही ना काही टीका करत असतात. त्यावेळेस ते संयमाने वागले असते तर शिवसेनेचे ५६ आमदार आज भाजपसोबत दिसले असते, असे ना. पाटील म्हणाले.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर टीका म्हणजे उंदराने चिंधी पकडणे
जळगावमध्ये भाजपमधून शिवसेनेत आलेले अनेक नगरसेवक पुन्हा भाजपमध्ये निघाले आहेत. याविषयी ना. पाटील यांना विचारले असता, भाजप त्यांना अपात्रतेची भीती दाखवत आहे. त्यामुळेच हे नगरसेवक आता भाजपकडे जाताना दिसत आहेत, असं त्यांनी सांगितलं. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर टीका करणे म्हणजे उंदराने काहीतरी चिंधी पकडणे, अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली. राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. मात्र हे पॅकेज शेतकऱ्यांसाठी अपुरे असल्याची खंतही पाटील यांनी व्यक्त केली.