जळगाव (प्रतिनिधी) ‘महाराष्ट्राच्या राजकारणात असं वक्तव्य आम्ही कधी अनुभवलं नाही. देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य हे पंतप्रधानांनाही मान्य नसेल. कारण, नरेंद्र मोदी यांनी कायम बाळासाहेबांचा आदरच केला आहे.’ जर देवेंद्र फडणवीस मला वडिलधारे मानत असतील तर त्यांना सल्ला देऊन उपयोग आहे. मात्र, फडणवीस सातत्याने करत असलेले वक्तव्य हे नैराश्येतून आलं आहे’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केली आहे.
फडणवीस यांच्या वक्तव्याने अत्यंत वेदना झाल्या
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना जनाब बाळासाहेब असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देत ‘फडणवीस यांच्या वक्तव्याने अत्यंत वेदना झाल्या असून हिंदुत्वाचे प्रखर विचार मांडणारे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या लेखणीतून व वाणीतून समाज जागृत करण्याचे काम केलं आहे’ असं एकनाथ खडसे म्हणाले.
त्यावेळी बाळासाहेबांनी प्रतिकार केला
ते पुढे म्हणाले की, ‘अनेक संकट प्रसंगी स्वर्गीय बाळासाहेबांनी पुढाकार घेऊन १९९३ च्या बॉम्बस्फोट सारख्या घटनेतही सामोरे जाण्याचे आवाहन केले. इतकेच नाहीतर या संकटामध्ये प्रतिकार करण्याची भूमिका ही बाळासाहेबांनी घेतली होती. त्याकाळी बहुतांश राष्ट्रीय संघटना या घाबरलेल्या होत्या. कोणत्याही पक्षाची रस्त्यावर उतरून प्रतिकार करण्याची हिंमत त्यावेळी झाली नाही. त्यावेळी बाळासाहेबांनी प्रतिकार केला.’
फडणवीसांनी अशा प्रकारे तात्काळ प्रतिक्रिया देणे दुर्दैवी
मात्र, एमआयएम सोबत युती झाली नसताना देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारे तात्काळ प्रतिक्रिया देणे हे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे. इतकंच नाहीतर जरीही शिवसेनेसोबत एमआयएमची युती झाली असती तरीदेखील अशा प्रकारे वक्तव्य करणं हे चुकीचेच असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले.
















