जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर पतसंस्थेचे गैरव्यवहार प्रकरण तत्कालीन सरकारने दडपले होते. आता आधीच्या सरकारच्या सूचनेनुसारच कारवाई होत आहे. त्यात नव्याने काहीही झालेले नाही. बीएचआर हे प्रकरण गोरगरिबांशी निगडित आहे. यात गोरगरिबांना न्याय मिळाला तर ते राष्ट्रवादी काँग्रेसची साथ आयुष्यभर सोडणार नाहीत, असे एकनाथराव खडसेंनी म्हटले. ते पक्षाध्यक्ष शरद पवारांच्या वाढदिवसाचे नियोजन करण्यासाठी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित बैठकीत बोलत होते.
पक्षाध्यक्ष शरद पवारांच्या वाढदिवसाचे नियोजन करण्यासाठी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी दुपारी जिल्हा कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात दाखल झाले होते. बैठकीस माजीमंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार दिलीप वाघ, मनीष जैन, दिलीप सोनवणे, अरुण पाटील, जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, खडसेंच्या कन्या तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा ऍड. रोहिणी खडसे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय गरुड, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शरद पवार हे नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास लिहिताच येणार नाही. या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. भाजपला दूर ठेवत शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सरकार आणण्याचा चमत्कार केला. अटलबिहारी बाजपेयी यांनी ३२ पक्षांचा ट्रक पाच वर्षे यशस्वीपणे चालवला. मग तीन पक्षांची महाविकास आघाडीची रिक्षा का चालणार नाही, असे सांगत महाविकास आघाडी सरकार पडणार नाही. यावेळी बोलतांना खडसे यांनी पुढे सांगीतले की, मी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर अनेकांनी मला विचारणा केली की, तुम्ही राष्ट्रवादीचाच पर्याय का निवडला? भाजप मी सोडली नाही, तर मला भाजपने अक्षरशः बाहेर ढकलले. जपने मला पक्ष सोडायला भाग पाडले. अशा परिस्थितीत बहुजन समाजाला खऱ्या न्याय देणारे शरद पवारच आहेत. म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो. शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी मैलाचे दगड ठरतील, असे निर्णय घेतले. माझे पहिले मुख्यमंत्री म्हणून मी नव्वदीच्या दशकामध्ये त्यांच्यासोबत काम केले आहे. आज ना उद्या सरकार पडेल, असे भाजप नेत्यांकडून वारंवार सांगितले जात आहे. पण वर्ष झाले अजून तसे काहीही घडलेले नाही. भाजप आपले आमदार सांभाळण्यासाठी हे सरकार पडणार असल्याचे उद्योग करत आहे. मी तिकडे भाजपत असताना असे उद्योग केले आहेत. आमदार सांभाळण्यासाठी तसे करावेच लागते, अशी पुष्टीही खडसे यांनी जोडली.
शरद पवारांचा वाढदिवस येत आहे, हा वाढदिवस इतक्या उत्साहात साजरा करा की विरोधक पाहत राहिले पाहिजे. वातावरणनिर्मितीतून पक्ष विस्तार होत असतो. ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, तो पक्ष पुढे जातो. असे कार्यक्रम पक्ष वाढीसाठी निमित्त असतात. कोणत्याही प्रकारची गोष्ट असेल तर तिचा फायदा उचला. सरकारच्या चांगल्या कामांची माहिती लोकांपर्यंत पोहचवा. त्याने खूप फरक पडतो. याच पद्धतीने काम करूया. मला रुळायला फार वेळ लागत नाही. मला पद वगैरेची अपेक्षा नाही. माझा छळ झाला आहे, हेच फक्त माझ्या लक्षात आहे. तळागाळातील कार्यकर्ते आपल्याकडे कमी आहेत, त्यांना आपल्या पक्षात आणा. कार्यकर्ते, नेता, कार्यकर्ता व नेतृत्व यांच्यातील समन्वच पक्ष वाढवू शकतो. त्यामुळे संघटीत रावून काम करण्याचे आवाहन देखील खडसे यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष अड. रविंद्र पाटी, माजी गुलाबराव देवकर, माजी आमदार मनिष जैन, जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहीणी खडसे व संचालक संजय पवार यांनी देखील मनोगते व्यक्त केलीत.