मुंबई (वृत्तसंस्था) सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केलेल्या रेणू शर्मा या महिलेने ट्विट करत ‘तुम्हा सर्वांची इच्छा आहे मी माघार घेते’ असं म्हटलं आहे. तक्रारदार महिलेनं काही ट्वीट करत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तिनं ट्वीट करत म्हटलं आहे की, एक काम करा तुम्ही सर्वांनीच मिळून निर्णय घ्या. कोणतीही माहिती नसताना जे मला ओळखतात तेदेखील चुकीचे आरोप करत असतील तर सर्वांनी मिळून निर्णय घ्या. ज्याप्रमाणे तुम्हा सर्वांची इच्छा आहे मी माघार घेते, असं त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांमुळे राज्यात खळबळ माजली असताना पीडितेच्या आरोपांना कलाटणी देणाऱ्या घडामोडी घडल्या आहेत. भाजपा आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हालाही या महिलेने गळ घातल्याची तक्रार पोलिसांत केली आहे. याशिवाय जेट एअरवेजच्या एका माजी अधिकाऱ्याचाही यामध्ये समावेश आहे. यानंतर एक मोठी अपडेट आली असून तक्रारदार महिलेने आपण माघार घेत असल्याचं ट्विट आहे. “जर मी चुकीची आहे तर हे लोक आतापर्यंत समोर का नाही आले? मी जरी मागे हटले तरी, कोणत्याही पक्षाचं नाव न घेताही मला खाली पाडण्यासाठी आणि आता हटवण्यासाठी इतक्या लोकांना एकत्र यावं लागलं आणि त्यांच्याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात मी एकटी मुलगी लढत होती याचा अभिमान आहे. आता तुम्हाला जे लिहायचं आहे ते लिहा,” असंही तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. मुंडे यांच्यावरील आरोपांना नवी कलाटणी मिळाली असून भाजपा आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हालाही या महिलेने गळ घातल्याची तक्रार पोलिसांत केली आहे. संबंधित महिलेने आपल्यालाही अडकवण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार भाजपाचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी केली. हेगडे हे फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. मनसेचे पदाधिकारी मनीष धुरी यांनीही आपल्याला या महिलेने दूरध्वनी केले असा आरोप केला आहे. या दोन राजकीय नेत्यांशिवाय जेट एअरवेजच्या एका माजी अधिकाऱ्याने महिलेबाबत अशीच तक्रार नोंदवली आहे.
रेणू शर्मा या महिलेने ट्विटरवरुन धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत. त्यांनी धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप करत ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत मुंडे यांनी लग्नाचं अमिष दाखवून फसवणूक केली. तसेच बलात्कार करून शारीरिक शोषण केल्याचा आरोप शर्मा यांनी केलाय. पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यानंतर रेणू शर्मा यांनी सलग ट्विट करत पुन्हा काही प्रश्न उपस्थित केले आहेत. धनंजय मुंडे यांनी मला ट्विटरसहीत सगळीकडे ब्लॉक करण्यामागचं कारण काय? असा सवाल रेणू यांनी केल. पोलिसात तक्रार दाखल करताच मुंडे यांनी पुन्हा अनब्लॉक केल्याचंही शर्मा यांनी म्हटलं आहे.