धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील रामदेवजी बाबा नगरमधील एका विद्युत खांबातून विजेचा प्रवाह उतरल्यामुळे दोन वराहांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे याच ठिकाणी अनेक लहान मुलं खेळत असतात. परंतू सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. परंतू नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे.
या संदर्भात अधिक असे की, आज दुपारी धरणगाव शहरात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. यानंतर रात्री ८ वाजेच्या सुमारास रामदेवजी बाबा नगरमधील एका विद्युत खांबातून विजेचा प्रवाह उतरल्यामुळे दोन वराहांचा मृत्यू झाला. पवन पचेरवार यांचे यामुळे साधारण २० हजाराचे नुकसान झाले. विशेष म्हणजे याच ठिकाणी अनेक लहान मुलं खेळत असतात. परंतू सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. विद्युत खांबातून विजेचा प्रवाह उतरल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी लागलीच महावितरणच्या कर्मचाऱ्यांना फोन लावत घटनेची माहिती दिली. त्यानंतर चार वायरमन आले आणि त्यांनी संबंधित खांबाचा विद्युत पुरवठा खंडित केला. तसेच हा खांब आमच्या नव्हे तर धरणगाव पालिकेशी संबंधित असल्याचे सांगितले. दरम्यान, नुकसानग्रस्त पवन पचेरवार यांना मदत मिळावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.