नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत ५ हजारांनी घट झाली. गेल्या २४ तासांत २५ हजार ०७२ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ३८९ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.
देशात गेल्या २४ तासांत २५ हजार ०७२ कोरोनाबाधित आढळले असून ३८९ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर, ४४ हजार १५७ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. देशातील एकूण रुग्णसंख्या ३ कोटी २४ लाख ४९ हजार ३०६वर पोहोचली असून आतापर्यंत ३ कोटी १६ लाख ८० हजार ६२६ रुग्ण बरे झाले आहेत. देशात सध्या ३ लाख ३३ हजार ९२४ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ही रुग्णसंख्या गेल्या १५५ दिवसांत सर्वात कमी आहे. दरम्यान, देशातील रिकव्हरी रेट ९७.६३ टक्क्यांवर असून विकली पॉझिटीव्हीटी रेट १.९१ टक्क्यांवर आहे. तर डेली पॉझिटीव्हीटी रेट १.९४ टक्क्यांवर आहे. आतापर्यंत एकूण ४ लाख ३४ हजार ७५६ जणांचा मृत्यू झाला आहे.
तसेच देशात गेल्या २४ तासांत ७ लाख ९५ हजार ५४३ जणांचं लसीकरण करण्यात आलं. दरम्यान, लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ५८ कोटी २५ लाख ४९ हजार ५९५ जणांचं लसीकरण पूर्ण झालंय.
राज्यातील स्थिती
राज्यात काल ४ हजार १४१ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४ हजार ७८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६३ लाख ३१ हजार ९९९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे. राज्यात काल १४५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.११ टक्के झाला आहे. राज्यात सध्या ५३ हजार १८२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.