नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास ७ हजारांनी घट झाली. गेल्या २४ तासांत २५ हजार १६६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ४३७ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.
केंद्रीय आरोग्यमंत्रालयाकडून जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये २५,१६६ नवीन कोरोनबाधितांची नोंद झाली आहे. तर ४३७ कोरोना रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यापूर्वी १५ मार्च रोजी २४,४९२ रुग्णांची नोंद झाली होती. त्याचबरोबर, देशभरात गेल्या २४ तासांमध्ये ३६,८३० लोक कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाच्या सुरुवातीपासून देशात एकूण तीन कोटी २२ लाख ५० हजार लोकांना संसर्ग झाला आहे. यापैकी ४ लाख ३२ हजार ७९ लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३ कोटी १४ लाख ४८ हजार लोकांनी कोरोनावर मात केली आहे. देशात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांपेक्षा कमी आहे. एकूण ३ लाख ६९ हजार रुग्ण सध्या उपचाराधिन आहेत.
डेल्टा प्लसची रुग्ण संख्या ७६ वर
दरम्यान राज्यात दहा डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले असून राज्यातील रुग्णांची संख्या ७६ वर पोहोचली आहे. दर महिन्याला प्रत्येक जिल्ह्य़ातून १०० नमुने जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेन्सिंग) चाचणीसाठी पाठविले जात आहेत. यातून डेल्टा प्लसबाधित रुग्णांचे निदान केले जाते. राज्यात यापूर्वी ६६ रुग्ण डेल्टा प्लस बाधित आढळले होते. सोमवारी आणखी दहा रुग्ण आढळले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सहा, रत्नागिरीमध्ये तीन, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात एक रुग्ण आढळला आहे.