नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास एक हजाराने वाढ झाली. गेल्या २४ तासांत ३६ हजार ४०१ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ५३० कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ३६ हजार ४०१ नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. तर, ५३० रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून ३९ हजार १५७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या ३ कोटी २३ लाखांवर गेली असून त्यापैकी ३ कोटी १५ लाख २५ हजार ८० रुग्ण बरे झाले आहेत. देशात सध्या ३ लाख ६४ हजार १२९ सक्रिय रुग्ण उपचाराधिन आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या गेल्या १४९ दिवसांतील सर्वात कमी आहे. तर, आतापर्यंत ४ लाख ३३ हजार ४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा रिकव्हरी केट ९७.५३ टक्के आहे. तर विकली पॉझिटीव्हीटी रेट १.९५ टक्के असून गेल्या ५५ दिवसांपासून हा रेट ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच डेली पॉझिटीव्हीटी रेट १.९४ टक्के असून तो गेल्या २४ दिवसांपासून ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. आतापर्यंत ५०.०३ कोटी कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशातील लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ५६ कोटी ६४ लाख ८८ हजार ४३३ जणांचं लसीकरण पूर्ण झालंय. गेल्या २४ तासांत देशभरात ५६ लाख ३६ हजार ३३६ जणांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून कमी होऊ लागली आहे. काल (बुधवारी) ५,१३२ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ८ हजार १९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६२ लाख ०९ हजार ३६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९३टक्के आहे. राज्यात काल (बुधवारी) १५८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.११ टक्के झाला आहे. तब्बल ३७ महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या ५८ हजार ०६९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.