नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली. गेल्या २४ तासांत ४१ हजार ८३१ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ५४१ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ताजी आकडेवारी जाहीर केली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर देशात ४१ हजार ८३१ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, ३९ हजार २५८ रुग्ण उपचार घेत बरे झाले तर यात ५४१ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सक्रिय रुग्णांची संख्या आता ४ लाख ४ हजार ८०४ एवढी आहे. देशात आतापर्यंत ३.१६ कोटी लोक कोरोना महामारीच्या विळ्याख्यात सापडले आहे. तर ३.०८ कोटी लोक उपचार घेत बरे झाले आहे. देशात आतापर्यंत ४.२४ लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून नऊ हजारांच्या आत येऊ लागली आहे. काल शनिवारी ६,९५६ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ७ हजार ७८६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ६० लाख ९० हजार ७५६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६२ टक्के आहे. राज्यात काल २२५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.०१ टक्के झाला आहे. तब्बल ३२ महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये काल एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या ७६ हजार ७५५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.