नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत ११ हजारांनी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत ४१ हजार ९६५ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ४६० कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ४१ हजार ९६५ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे, देशात सद्यस्थितीत करोनावर उपचार घेणाऱ्यांचा एकूण आकडा ३ लाख ७८ हजार १८१ वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे याच २४ तासांत देशात ३३ हजार ९६४ जण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी गेले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आता ३ कोटी १९ लाख ९३ हजार ६४४ वर पोहोचली आहे. दरम्यान, या एका दिवसातील नव्या कोरोना रुग्णांचा आकडा हा करोनामुक्त झालेल्यांपेक्षा अधिक आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण ३ कोटी २८ लाख १० हजार ८४५ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी, ३ कोटी १९ लाख ९३ हजार ६४४ इतके रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, गेल्या २४ तासांत देशात ४६० इतक्या लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यामुळे, देशातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा आता थेट ४ लाख ३९ हजार २० वर पोहोचला आहे. त्यामुळे, निश्चितच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात मंगळवारी (३१ ऑगस्ट) ४ हजार १९६ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहे. तर ४ हजार ६८८ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. याच एका दिवसात राज्यात १०४ कोरोना रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. तर आतापर्यंत राज्यात एकूण ६२ लाख ७२ हजार ८०० कोरोना रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०३ टक्क्यावर पोहचला आहे.