नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत ६ हजारांनी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत ४७ हजार ०९२ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ५०९ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये ४७,०९२ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. याच्या एक दिवस आधी ४१,९६५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचबरोबर, गेल्या २४ तासांत ५०९ कोरोनाबाधित रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर बुधवारी ३५,१८१ रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. कोरोनाच्या सुरुवातीपासून एकूण तीन कोटी २८ लाख ५७ हजार लोकांना संसर्ग झाला आहे. यापैकी ४ लाख ३९ हजार ५२९ लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३ कोटी २० लाख २८ हजार लोक बरे झाले आहेत. देशात करोना सक्रिय रुग्णांची संख्या तीन लाखांहून अधिक आहे. एकूण ३ लाख ८९ हजार लोकांना अद्यापही उपचाराधीन आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, १ सप्टेंबरपर्यंत देशभरात करोना लसीचे ६६ कोटी ३० लाख ३७ हजार डोस देण्यात आले आहेत. बुधवारी ८१.०९ लाख लसी देण्यात आल्या. त्याचबरोबर, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्यानुसार, आतापर्यंत ५२ कोटी ५० लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. बुधवारी सुमारे २० लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या, ज्यांचा सकारात्मकता दर ४ टक्क्यांपेक्षा कमी आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात काल ४,४५६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४ हजार ४३० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६२ लाख ७७ हजार २३० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०३ टक्के आहे. राज्यात काल १८३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के झाला आहे. राज्यात सध्या ५१ हजार ०७८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.