मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठने कामाच्या वेळी केस विंचरायला जाणं हा गंभीर गैरवर्तनाचा प्रकार असल्याचं म्हटलं आहे. एक गिरणी कामगार विरुद्ध कंपनी या खटल्यामध्ये न्यायालयाने हे निरिक्षण नोंदवलं आहे. या कामगाराने त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर हात उगारला आणि त्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप कंपनीने केला होता. अशाप्रकारे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत वागणं हे गंभीर गैरवर्तन असल्याचंही न्यायालयाने म्हटलं आहे.
मुंबई उच्च न्यायालयातील नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती विनय देशपांडे यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. ‘कंपनीची अंतर्गत चौकशी आणि कायदेशीर कारवाई एकाचवेळी होऊ शकते. दोन्ही तपास स्वतंत्र पद्धतीने करण्यात आले. कायद्यासमोर व्यक्ती दोषी ठरणं हे खाजगी कंपनीच्या अंतर्गत चौकशीमध्ये दोषी ठरवण्यापेक्षा फार मोठी गोष्ट आहे’. रंगाराव यांनी कामाच्या ठिकाणी कामाच्या वेळेत आपलं काम करण्याऐवजी बाजूला जाऊन केस विंचरण हे कामाच्या कालावधी केलेलं गंभीर गैरवर्तनच आहे. इतकच नाही तर जेव्हा वरिष्ठांनी त्यांना समज देत काम करण्यास सांगितलं तेव्हा त्यांनी काम सुरु करण्याऐवजी उलट वरिष्ठांनाच शिवीगाळ करुन त्यांना धक्काबुक्की सुरु केली. हे त्याहून मोठं गैरवर्तन आहे, असं निरीक्षण नोंदवत हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार देत त्यांची याचिका फेटाळून लावली.
रंगाराव चौधरी असं याचिका दाखल करणाऱ्या गिरणी कामगाराचं नाव आहे. डिसेंबर २००५ मध्ये कामगार न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आवाहन देणारी याचिका रंगाराव यांच्यावतीने उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. कामगार न्यायालयाने कंपनीने रंगाराव यांना सेवेतून कमी करण्याची कारवाई योग्य असल्याचा निकाल दिला होता. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार १९९५ साली मे महिन्यामधील एका कामाच्या दिवशी वरिष्ठ अधिकारी पहाणी करण्यासाठी गेले असता रंगाराव हे स्वत:च्या मशीनवर नव्हते. ते दुसरीकडे जाऊन केस विंचरत होते. हा सर्व प्रकार नाईट शिफ्टमध्ये घडला. रंगाराव यांनी तातडीने जागेवर जाऊन कामास सुरुवात करावी असं वरिष्ठ अधिऱ्याने सांगितल्यानंतर रंगाराव संतापले. त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली तसेच तेथे पडलेली लोखंडाची सळई आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फेकून मारल्याचा आरोप कंपनीने केलाय. यानंतर कंपनीने रंगाराव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच कंपनीने अंतर्गत समिती बसवून घडलेल्या प्रकरणाचा तपास केल्यानंतर रंगाराव दोषी आढळल्याने त्यांना कामावरुन काढून टाकण्याचा निर्णय घेतला.
या घटनेनंतर कंपनीने रंगाराव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत या प्रकरणाची अंतर्गत चौकशीही केली होती. प्रकरणाचा तपास केल्यानंतर त्यात रंगाराव दोषी आढळल्याने त्यांना कामावरुन काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या प्रकरणामध्ये करण्यात आलेल्या मारहाणीसंदर्भात आपण शिक्षा भोगली असल्याने कंपनीने केलेली कारवाई रद्द करावी अशी मागणी करत कोर्टात दाद मागितली होती.