मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई महानगरपालिका शिवसेनेकडून हिसकावून घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. मुंबईच्या विकासाकडे शिवसेनेनेन आजपर्यंत दुर्लक्ष केलेले आहे. प्रत्येकवेळी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते. मुंबईची तुंबई करण्याचाच प्रयत्न शिवसेनेकडून झाला आहे. म्हणून शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढणं आवश्यक आहे. असं मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं.
रामदास आठवले म्हणाले, “मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आरपीआयला ३५ ते ३६ जागा मिळाल्या पाहिजे. आमचा यापैकी १८ ते २० जागा निवडून आणायचा प्रयत्न असेल. मुंबई महानगरपालिका शिवसेनेकडून हिसकावून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. शिवसेनेचे मुंबईच्या विकासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. प्रत्येकवेळी पावसाळ्यात मुंबई तुंबते, मुंबईची तुंबई करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून झाला आहे. म्हणून शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढणे अत्यंत आवश्यक आहे.”
“यशवंत जाधव यांना ४ वेळा स्थायी समिती सभापद दिले. मात्र, बौद्ध असल्यामुळे महापौर पदाची संधी दिली नाही. यशवंत जाधव यांच्या पत्नी आमदार आहेत. मात्र, तरीही त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले नाही. बौद्ध समाजाला डावलण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून वारंवार झाला आहे. सध्या यशवंत जाधव यांची चौकशी सुरू आहे. त्यांनी त्यांची बाजू मांडली, मात्र शिवसेना यशवंत जाधवांची बाजू घ्यायला तयार नाही,” असा आरोप रामदास आठवले यांनी केला.
















