नागपूर (वृत्तसंस्था) ‘भाजपने देशाच्या जनतेला राष्ट्रभक्ती शिकवण्याचे काम करू नये. पंतप्रधान मोदी यांनी लोकशाहीच्या पवित्र अशा वास्तूमध्ये आंदोलकांना आंदोलनजीवी म्हणणे हे चुकीचे होते. मोदींनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळले आहे, अशी टीका नाना पटोले यांनी मोदींवर केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दिल्ली दौरा आटोपून नागपुरात परतलेल्यानंतर नाना पटोले यांचं जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी पत्रकारांशी बोलत असताना नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला. ‘मोदी यांची तुलना नटसम्राट यांच्यासोबत केली तर वावगे ठरणार नाही, त्यांना नटसम्राट बनायचं असेल तर त्यांनी सिनेमात जावं’ अशा शब्दांत काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. तसंच, ‘काळे कायदे आणून शेतकऱ्यांना आंदोलनास भाग पाडले आहे. शेतकऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे आणि त्यांच्यावर टीका करण्याची जी काही प्रथा मोदींनी सुरू केली आहे, त्यांचे राष्ट्रप्रेम आता उघडे पडले आहे’, अशी टीकही नाना पटोले यांनी केली. ‘राज्यसभेमध्ये नरेंद्र मोदी हे भावुक झाले होते, पण ज्यावेळी २६ जानेवारीला शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणून जाहीर केले होते, शेतकरी नेते राकेश टिकैत यांना त्रास दिला होता आणि त्यामुळे त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते, हे भाजपच्या नेत्यांना दिसले नाही का? राज्यसभेत मोदी यांनी मगरीचे अश्रू ढाळले होते. त्या सगळ्या गोष्टी देशातील लोकं ओळखून आहे. त्यांची तुलना जर नटसम्राटाशी केली तर शब्द अपुरा पडणार नाही, त्यांना नटसम्राट राहायचं असेल तर त्यांनी कुठल्या सिनेमात जावे, पण लोकशाहीमध्ये असा ड्रामा आता कुणी सहन करणार नाही, अशी विखारी टीकाही पटोले यांनी केली.