जळगाव (प्रतिनिधी) अजित पवार (Ajit pawar) यांनी त्यांची चूक सुधाली, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी त्यांची चूक सुधारली. पण उद्धव ठाकरे यांनी सुधारली नाही. त्यांना ‘ग’ ची बाधा नडली, असा हल्ला गुलाबराव पाटील यांनी चढवला.
जळगावात पत्रकारांशी बोलतांना राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. मी भगोडा नव्हतो. मी त्यांना सांगूनच बाहेर पडलो. ज्या ताटात खाल्लं त्या ताटात घाण करायची आपली संस्कृती नाही. मात्र योग्य वेळी आपण उत्तर देऊ. राजकारणात शिवसेना फुटून शिंदे गट वेगळा झाला. त्यावेळी आपण 40 पैकी 33वा आमदार म्हणून मी शिंदे गटात सहभागी झालो होतो.
राजकारणात जे घडतं होतं त्याची पक्ष नेतृत्वाला आपण सूचना केली होती. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. जर ती घेतली असती तर आज ही वेळ आली नसती, असंही पाटील म्हणाले. अजित पवार यांनी सकाळी सकाळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यांनी त्यांची चूक दुरुस्त केली. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचे आमदार फुटून गेले होते. त्यांनी लगेच आपली चूक सुधारून पुन्हा त्यांना आपल्या बाजूला करण्यात यश मिळविले होते. आमच्या बंडावेळीही ते शक्य होते. मात्र उद्धव ठाकरे यांची ऐकण्याची मानसिकता नव्हती. कधी कधी खूप ग खूप नडतो आणि त्याचाच हा परिणाम आहे, अशी टीका ना . पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.