मुंबई (वृत्तसंस्था) जे कारटून मी शेअर केले ती लोकांची भावना आहे. दबावाचं राजकारण करायचे तर करा. आम्ही संयमाने या गोष्टी घेत आहोत, आणि मजाही लुटत आहोत. व्यंग ज्यांना समजले ते त्या पद्धतीने घेतील. ज्यांना नाही समजले ते आणखी सूडबुद्धीने वागतील. ज्या लोकांना विकृत आनंद घ्यायचा आहे ते घेतील. सगळे विकत घ्यायचे, गुलाम तयार करायचे ही ईस्ट इंडिया कंपनीची परंपरा होती, असा टोला शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी भाजपचे नाव न घेता लगावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत. तसेच कंगना राणौतला नुकसानभरपाई देण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. सकाळीच राऊत यांनी सीबीआय आणि ईडीवर एक कार्टून पोस्ट करत, खळबळ उडवून दिली आहे. संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या फोटोमध्ये सीबीआय आणि इडी यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. संजय राऊत यांच्या या ट्विटनं पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे. तसंच, या ट्विटबाबत राऊतांना विचारलं असता, त्यांनी ज्यांना हे व्यंगचित्र समजलं, ते त्या भावनेनं घेतील, ज्यांना नाही समजलं ते अधिक सूड भावनेनं वागतील, अशी प्रतिक्रिया दिली आहे. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात नेहमीच दबावाचं राजकारण केलं जातं, मात्र, संघर्ष करणं हा दोन्ही राज्यांचा स्वभाव आहे. दबावाच्या राजकारणानं जर तुम्ही महाराष्टात सत्तांतर करु शकता तर आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेतच, असा टोला संजय राऊत यांनी हाणला आहे.