नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दाहोद जिल्ह्यातील फतेहपुरा तालुक्यात सहा मुलांची आई १४ वर्षाच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि त्याच्यासोबत पळून गेल्याची अजब घटना उघडकीस आली आहे. ४० वर्षीय विवाहित महिला अल्पवयीन मुलासोबत पळून गेल्याने पोलीसही चकीत झाले आहेत. मुलाच्या नातेवाईकांनी पोलिसांत धाव घेतली आहे. याप्रकरणाचा पोलीस आता अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दाहोद जिल्ह्यातील फतेहपुरा तालुक्यात राहणारी महिला आपल्या पतीच्या मित्राच्या १४ वर्षीय मुलासोबत पळून गेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेला पतीपासून सहा मुलं आहेत आणि आता तिचं १४ वर्षीय मुलावर प्रेम जडलं आहे. यानंतर ते पळून गेले होते. तेव्हा मुलाच्या कुटुंबीयांनी दोघांनाही शोधून काढलं आणि समस्या सोडवण्यासाठी त्यांना गावात परत आणण्याचा निर्णय घेतला. पण दोघेही पुन्हा एकदा पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मुलाच्या कुटुंबीयांनी महिलेने १४ वर्षाच्या मुलाचे अपहरण केल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात धाव घेतली. विवाहित महिलेसोबत पळून गेलेला मुलगा अमलीखेडा गावचा आहे. मुलाच्या वयाची खात्री करण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांना मुलाचा जन्मदाखला आणण्यास पोलिसांनी सांगितलं आहे. कुटुंबीयांनी दाखविलेल्या मुलाच्या आधारकार्डनुसार, त्याचे जन्म वर्ष २००७ आहे. यामुळे तो १४ वर्षाचा ठरतो. पण तपासादरम्यान त्याच्या वडिलांशी झालेल्या संभाषणातही तो प्रोढ आहे आणि १९९७ मध्ये त्याचा जन्म झाला आहे, असे समोर आले आहे. आम्ही मुलाच्या कुटुंबीयांना त्याचा जन्म दाखला सादर करण्यास सांगितल असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.