विरार (वृत्तसंस्था) नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘जय भीम’ चित्रपटाच्या कथेची पुनरावृत्ती वाटावी, अशी घटना वसईत उघडकीस आली आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या सहा आदिवासी महिलांना चोर समजून पोलिसांनी बेदम मारहाण केली. पोलिसांनी या चार आदिवासी महिलांना चोरीच्या केवळ संशयावरून ताब्यात घेवून मारहाण करून सोडून दिले.
कासा परिसरात राहणाऱ्या बेबी नारायण वावरे, दीपिका दिनेश वावरे, विमल माणक्या पुंजारा, सोनम सबू भोईर, सीता संताराम भोईर, तारु सुभाष डोकफोडे मूळ राहणार कावडास कासा आता कामासाठी पापडी तलाव कोळीवाडा या ठिकाणी राहतात. या महिला वसईत बिगारी काम करतात. शुक्रवारी या महिला पापडी येथे बाजार भरत असल्याने घरी जाताना बाजारहाट करत असताना काही नागरिकांनी या चोरी करण्यासाठी आल्याचे सांगत पोलिसांना माहिती दिली. यावेळी पोलिसांनी त्यांना रिक्षात भरून पापडी चौकीत नेले. येथील सहायक पोलीस निरीक्षक वाघ आणि त्यांच्या साथी पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना दंडुक्याने मारहाण करत चोरीचा आरोप लावला. तसेच त्यांना पुन्हा बाजारात न दिसण्याची धमकी दिली.
तर, महिलांनी या संदर्भात आदिवासी संघटना यांना माहिती दिल्यावर त्यांनी या प्रकरणी पोलिसांना जाब विचारला असता पोलिसांनी केवळ समज देण्यासाठी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना कोणतीही मारहाण केली नसल्याचा दावा केला आहे. तर वसई विरार महानगर पालिकेच्या आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय तपासणीत महिलांच्या दंडावर मारहाण झाल्याचे समोर आले आहे.