जळगाव (प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढविणाऱ्या ४९ उमेदवारांना निवडणूक काळासाठी शस्त्रधारी अंगरक्षकाची सुरक्षा पुरविली जाणार आहे. याबाबतचा निर्णय जिल्हास्तरीय समितीने घेतला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यात निवडणूक काळात झालेल्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या जिल्हास्तरीय समितीने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या जीवीताला असलेल्या धोक्याबाबत तपासणी करून एक शत्रधारी अंगरक्षक पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. यात जिल्ह्यातील ११ मतदारसंघातील ४९ उमेदवारांना, अशा प्रकारची सुरक्षा उद्या दि. ६ पासून पुरविली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी दिली. तसेच ही सुरक्षा केवळ निवडणूक काळासाठी राहणार असून भविष्यात पुन्हा सुरक्षा देण्याच्यादृष्टीने जिल्हास्तरीय समिती आवश्यक तो निर्णय घेणार असल्याचे डॉ. रेड्डी यांनी सांगितले.