जळगाव (प्रतिनिधी) जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने काल जळगाव-मालेगाव दरम्यान नवजीवन एक्सप्रेसमधून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या दोघ चोरटयांनी तामीळनाडू राज्यातून एका ठिकाणी कामाला असलेल्या घरातून ५० लाख रूपयांची रोकड लांबविली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, मोहनकुमार जगाथागी, दवनयागम सोवा पेट सेलम (तामिळनाडू) त्यांच्याकडे कामाला असलेले दोन नोकर यांनी १९ मे सायंकाळी ७ ते २० मे सायंकाळी ७.३० दरम्यान घरात जबरी चोरी करून ५० लाख रूपयांची रोकड लांबविल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी मोहनकुमार जागाथानी यांच्या फिर्यादीवरून तामिळनाडूतील सेलम पोलीस ठाण्यात दोघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपी राजस्थान येथील असल्यामुळे चोरीतील रोकड घेवून राजस्थान येथे जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सेलमचे पोलीस अधिक्षक यांनी जळगाव पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. संशयित दोन्ही आरोपी हे चेन्नई-अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेसमधून जाण्याची दाट शक्यता असल्याचे सांगितले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना सुचना देवून संशयित आरोपीसह मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सुचना दिल्यात. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने आज मलकापूर ते जळगाव दरम्यान नवजीवन एक्सप्रेसच तपासणी केली. त्यात संशयित आरोपी मंगलराम आसुराम बिस्नोई (वय-१९) रा. खडाली ता. गुडामालाणी जि.बडमेर (राजस्थान) आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मुद्देमालापैकी ३७ लाख ९७ हजार ७८० रूपये हस्तगत करण्यात आले आहे.