जळगाव (प्रतिनिधी) कंपनीत क्वालिटी कंट्रोल बॉयलरचे अचानक तापमान वाढले, त्यावर नियंत्रण न मिळवता आल्याने मोरया ग्लोबल लिमिटेड या सुगंधीत द्रव्य (परफ्यूम) वे कच्चे रसायन तयार करणाऱ्या कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाला. यामुळे संपूर्ण कंपनी आगीच्या विळख्यात सापडल्याने पूर्णपणे जळून खाक झाली. यामध्ये कंपनीत पहिल्या शिफ्टमध्ये काम करणारे सुमारे २६ कामगारांपैकी २४ कामगार भाजले गेले. त्यांच्यातील ९ जण हे ५० टक्क्यांपेक्षा अधिक भाजले गेल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे. याप्रकरणी कंपनीच्या मालकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील औद्योगिक वसाहतीमध्ये डबल्यू सेक्टरमध्ये मोरया ग्लोबल लिमीटेड नावाची कंपनी असून याठिकाणी सुगंधीत द्रव्यांसाठी लागणारे कच्चे रसायन तयार केले जात होते. या कंपनीचे कामकाज तीन शिफ्टमध्ये चालत असल्याने प्रत्येक शिफ्टला अधिकाऱ्यांसह किमान तीस ते चाळीस कर्मचारी काम करतात. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी ७ वाजता पहिल्या शिफ्टचे कर्मचारी कामावर हजर होऊन ते काम करीत होते. कंपनीत असलेल्या पाच बॉयलरपैकी क्वालिटी कंट्रोल (क्यूसीक्यूसी) करणाऱ्या बॉयरचे अचानक तापमान वाढले, त्यावर नियंत्रण न मिळवता आल्याने त्या बॉयलरचा सकाळी ९ वाजून १३ मिनिटांनी स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, आजूबाजूचा परिसर हादरुन गेला होता.
जखमींना दुचाकीवरुन केले रुग्णालयात दाखल
पहिल्या शिफ्टमधील कर्मचारी काम करत असतांना जनरल शिफ्टचे कर्मचारी हे कंपनीत येत होते. त्यांना कंपनीत स्फोट होऊन आग लागल्याचे समजताच त्यांनी जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना वाहनांवर बसवून रूग्णालयात दाखल केले. या कंपनीतील अकाऊंट विभागात काम करणारा शुभम वाणी हे गेटमधून कंपनीत शिरत असतांनाच त्यांच्या डोळ्यासमोर बॉयरलाचा स्फोट झाल्याने ते सून्न झाले होते.
सहा तासानंतर आगीवर नियंत्रण !
कंपनीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जळगाव शहर र महापालिका, वरणगाव येथील आयुध निर्माणी, जैन इरीगेशन, सुप्रीम इंडस्ट्रीज, जामनेर, नशिराबाद, धरणगाव, नशिराबाद, पारोळा, पाचोरा येथून अग्नीशमन बंबांना पाचारण करण्यात आले होते. बाहेरील तापमान आणि आतील आगीमुळे प्रचंड उष्णता असल्याने आत पाण्याचे पाईप नेण्यासाठी मोठी अडचण होती. याठिकाणी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरसिंह रावळ यांच्या टीमने प्रयत्नांची पराकाष्ठा करीत सहा तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविले.
जीवाच्या अकांताने पळत सुटले !
बॉयरचा स्फोट होताच कंपनीला आग लागून आगीने काही क्षणातच रौद्ररुप धारण केले. कंपनीत काम करणारे कर्मचारी जीव वाचविण्यासाठी मिळेल त्या दिशेने धावत सुटले. या आगीत काम करणाऱ्या २६ पैकी २४ कर्मचारी जखमी झाले असून त्यातील ७ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
जिल्हाधिकारी झाले फायरमन !
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अधिकारीपणाचा कुठलाही बडेजाव न आणता घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी दाखल होत थेट अग्नीशमन दलाच्या वाहनावर चढून पथकाला आग विझवण्यासंबंधी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी नव्हे तर फायरमॅनचीच भूमिका बजावल्याचे दिसून आले. तसेच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, तहसीलदार शितल राजपूत, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनीही घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.
सायंकाळी आढळला बेपत्ता कामगाराचा मृतदेह !
आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकासह पोलीसांकडून बेपत्ता असलेल्यंचा शोध घेतला जात होता. दरम्यान सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास कंपनीच्या अँगलखाली जळून कोळसा झालेल्या रामदास घोलाणकर यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला असून दोघ मयतांची डिएनए चाचणी झाल्यानंतर त्यांचे मृतदेह कुटूंबियांना सुपूर्द करण्यात येईल.
डोळ्यादेखत पती भाजले गेल्याने पत्नीला अश्रू अनावर !
कंपनीत साफसफाईचे काम करणाऱ्या सविता किशोर चौधरी यांचे पती किशोर दत्तात्रय चौधरी याच कंपनीत बॉयलर विभागात काम करीत होते, पहिल्या शिफ्टमध्ये किशोर चौधरी कामावर गेले होते, तर त्यांची पत्नी जनरल ड्यूटीला गेल्या होत्या, ऑफीसमध्ये सफाई करीत असतांना अचानकपणे ऑफीसच्या खिडकीची काच फुटली. मी बाहेर येऊन पाहते तो कंपनीत मोठा स्फोट होऊन आग लागल्याचे चित्र दिसून आले. या आगीत माझे पती किशोर दत्तात्रय चौधरी हे देखिल गंभीर जखमी झाल्याचे सविता चौधरी यांनी सांगितले. डोळ्यादेखत माझे पती भाजले गेल्याचे सांगतांना त्यांना अश्रु अनावर झाले होते.
५० टक्क्यांपेक्षा अधिक भाजले गेलेले कामगार !
स्फोट होवून लागलेल्या आगीत हेमंत गोविंदा भंगाळे (वय २७, प्रभात कॉलनी), गोपाल आत्माराम पाटील (रा. विखरण ता. एरंडोल ह. मु. जळगाव), सचिन श्रावण चौधरी (२४, रा. रामेश्वर कॉलनी), दीपक वामन सुवा (२५, रा. विठोबा नगर), फिरोज रज्जाक तडवी (४०, रा. रामेश्वर कॉलनी) हे ९० टक्के तर मयूर राजू खैरनार (२७, रा. जुना खेडी रोड) हे ८० टक्के, किशोर दत्तात्रय चौधरी (५०, रा. रामेश्वर कॉलनी) ७० टक्के, चंद्रकांत लक्ष्मण पाटील (२४, रा. धुळेह. मु. रामेश्वर कॉलनी), भिकन पुंडलिक खैरनार (४२, रा. इच्छा देवी मंदिर चौक) हे ६० टक्के गंभीररित्या भाजले गेले असून त्यांची प्रकृती चिंतानक आहे.
आगीमुळे आकाशात धुराचे प्रचंड लोळ !
कंपनीत झालेला बॉयलरचा स्फोट इतका भीषण होता की, स्फोट झालेल्या बॉयलरचे तुकडे हे कंपनी आजूबाजूला असलेल्या सुमारे ५० फुटांपर्यंत उडाले होते. तसेच आगीचे लोळ दुरपर्यंत आकाशात दिसून येत होते. दरम्यान, कंपनीच्या आजूबाजूच्या परिसरात राहणा-यांसह इतर कंपनीत काम करणाऱ्या नागरिकांनी बचाव कार्यात मदत केली.
लगीन घरावर दुःखाचा डोंगर !
आगीत होरपळून मयत झालेल्या समाधान पाटील यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू होता. येत्त्या २४ तारखेला त्यांच्या चुलत भावाचा विवाह असल्याने त्यांच्या घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. मात्र दुर्दैवी काळाच्या झडपेत समाधान पाटील यांचा मृत्यू झाला. त्यामुळे लगीन घरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
आग लागल्याने शेजारील कंपनीचे नुकसान !
स्फोट होऊन आग लागलेल्या केमिकल कंपनीच्या आजूबाजूला कुठलीही कंपनी नाही. त्यामुळे बचाव कार्य करतांना पथकाला कुठल्याच अडचणी आल्या नाही. केवळ या कंपनीच्या शेजारी असलेली आर. जी. इंडस्ट्रीज या कंपनीला स्फोटासह आगीच्या झळांमुळे नुकसान झाले आहे.