जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात ६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निघृणपणे हत्या करणाऱ्या आरोपीला आमच्या स्वाधीन करा, या मागणीसाठी आदिवासी समाजाच्या वतीने पोलीस ठाण्यात दगडफेक झाली होती. या दुदैवी घटनेत पोलीस निरीक्षकांसह ७ ते ८ पोलीस जखमी झाल्याची घटना २० रोजी रात्री घटली होती. परंतु, गुरुवारच्या घटनेनंतर जामनेर शहरात आज पोलिसांच्या बंदोबस्तामुळे छावणीचे स्वरुप आले असून शहरात तणावपूर्ण शांतता दिसून आली. दरम्यान, या घटनेप्रकरणी जवळपास ३०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून १४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा तपास एलसीबीचे वरिष्ठ पो. नि. बबन आव्हाड यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दत्तात्रय कराळे यांनी जामनेर पोलीस ठाण्यात भेट देऊन या घटनेची माहिती जाणून घेतली. तसेच सर्वांनी आपले दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू ठेवावेत, तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शहरात शांतता ठेवावी, असे आवाहन केले. दरम्यान, तालुक्यातील एका गावात केकतनिंभोरा येथील सुभाष उमाजी भील (वय ३५) या नराधमाने ११ जूनला सहा वर्षाच्या चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून केळीच्या शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार करून तिची तेथेच निघृणपणे हत्या केली होती. त्यानंतर हा आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता. या घटनेला १० दिवस उलटून ही आरोपी पोलिसांना सापडत नव्हता. त्यामुळे जामनेर पोलीस ठाण्याच्या वतीने या आरोपीचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल केले होते. २० रोजी सायंकाळी गुन्हा अन्वेषण विभाग व भुसावळ पोलिसांनी सुभाष भील यास भुसावळ येथील तापी नदीच्या परिसरातून मोठ्या शिताफीने अटक केली. त्यानंतर त्याला चौकशीसाठी जळगाव येथे नेण्यात आले होते. परंतु, सुभाष भील याला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी संतप्त आदिवासी समाज बांधव करत होते. तर पोलिसांकडून त्यांना शांत राहण्याचे आवाहन करण्यात येत होते.
रात्री जामनेर शहरातील पोलीस ठाण्यासमोर जमावाने ठिय्या आंदोलन करून महामार्ग रोखला. तसेच टायर ही जाळले होते. एवढेच नाही तर पोलीस ठाण्यावर दगडफेक करून रुग्णवाहिका, खासगी ट्रॅव्हल्ससह पोलीस गाड्यांच्या काचा फोडल्या तसेच दुचाकी जाळून नासधूस केल्याने दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. या संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करून लाठीचार्ज ही करावा लागला होता. जळगाव, धुळे आदी ठिकाणाहून दंगा नियंत्रण पथकासह पोलिसांचा अधिक फौजफाटा ही मागवण्यात आला होता. या घटनेत पोलीस निरीक्षकासह ७ ते ८ पोलिसांना गंभीर इजा झाली असून त्यांच्यावर जळगाव येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जखमींची आज विचारपुस केली.
वरिष्ठ अधिकारी जामनेरात दाखल; पोलिसांनी काढला रुटमार्च
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दत्तात्रय कराळे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी रात्रीच घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तर आणखी काही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून सकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून पोलिसांचा रूटमार्च काढण्यात आला होता. तर सदर घटनेतील दोषींवर त्वरीत कठोर कारवाई केली जाईल, असे सांगून नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत आहे.
संशयिताला २५ पर्यंत पोलीस कोठडी !
जामनेर तालुक्यातील एका गावातील सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिव्या खून प्रकरणात अटक केलेल्या संशयित आरोपीला शुक्रवारी २१ जून रोजी दुपारी ३ वाजता जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायमुर्ती शरद पवार यांनी त्याला २५ जून पर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. घटना घडल्यापासून सुभाष भील हा फरार होता. त्याला गुरुवार, २० जून रोजी रात्री १० वाजता त्याला भुसावळ शहरातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवार, २१ जून रोजी दुपारी ३ वाजता संशयित आरोपीला जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्या. शरद पवार यांनी पाच दिवसांची २५ जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावणी, सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. सुरेंद्र काबरा यांनी युक्तीवाद केला.
यांच्यावर दाखल झाले आहेत गुन्हे !
या प्रकरणी पो.उ. नि. दीपक रिठे यांच्या फिर्यादीनुसार जामनेर शहरासह तालुक्यातील संशयित आरोपी शालूसिंग शेवाळे, अशोक भील, श्रीराम भील, पंकज ठाकरे, प्रमोद सुरवाडे, युवराज पवार, आकाश पवार, प्रदीप कोळी, रितेष मोरे, अमोल सोनवणे, मंगल ठाकरे, दीपक पवार, आकाश पवार या १३ संशयितांसह ३०० ते ४०० महिलांसह पुरुषांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसआरपीच्या ६ तुकड्या तैनात ; शहराला आले छावणीचे स्वरुप !
जामनेर शहराच्या इतिहासातील पोलीस ठाण्यावर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. राज्य राखीव पोलीस दल बलगट क्रमांक सहाच्या तीन तुकड्या, जळगावसह आजूबाजूच्या पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संख्येमुळे शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. चाळीसगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, गुन्हा अन्वेषण विभागाचे पो. नि. बबन आव्हाड, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरूळे आदी अधिकारी परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले आहेत. तर शहरात शांतता प्रस्थापित करण्यात आलेली आहे.