मुंबई (वृत्तसंस्था) त्रिपुरातील हिंसाचार व यूपी शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या विरोधात काढण्यात आलेल्या निषेध मोर्चाला राज्य काही ठिकाणी गालबोट लागलंय. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पक्षाची भूमिका मांडली आहे. वसीम रिझवींना मोकळीक दिल्यामुळंच नियोजित पद्धतीनं वातावरण बिघडवण्याचाच हा प्रकार आहे, असा संशय त्यांनी व्यक्त केला.
‘आंदोलनं किंवा निषेध करण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र, भरकटलेल्या क्षेपणास्त्राप्रमाणे हे सगळं करणं चुकीचं आहे. आंदोलन पुकारणाऱ्यांनी त्याचं योग्य नियोजन करणं, हिंसाचार होणार नाही हे पाहिलं पाहिजे, असं मलिक म्हणाले. ‘घडलेल्या घटनांना जबाबदार असलेल्यांवर कारवाई होईलच, पण लोकांनी शांतता राखावी, असं आवाहन त्यांनी केलं.
शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनाही त्यांनी लक्ष्य केलं. ‘वसीम रिझवी हे मागील दोन-चार वर्षांपासून देशातला सलोखा बिघडवणारी विधान करत आहेत. पुस्तक लिहित आहेत. लोकांच्या भावना दुखावण्याचं काम करत आहेत. त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. नियोजित पद्धतीनं वातावरण बिघडवण्याचाच हा प्रकार आहे, असा संशय मलिक यांनी व्यक्त केला आहे.
‘रिझवी यांच्यावर वक्फ बोर्डात अफरातफर केल्याचा आरोप आहे. त्यांच्या विरोधात २०१७ मध्ये यूपी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. शिया समाजातील धार्मिक गुरूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व लखनऊचे खासदार राजनाथ सिंह यांच्याकडं याबाबत तक्रारही केली होती. त्यानंतर हे प्रकरण एक वर्षापूर्वी सीबीआयकडं वर्ग करण्यात आलं. मात्र, त्यावर सीबीआयनं काहीही कारवाई केलेली नाही. हे प्रकरण थंड बस्त्यात ठेवलं गेलं आहे. वसीम रिझवी यांना एक प्रकारे मोकळीक देण्यात आली आहे. त्यामुळं देशात वातावरण बिघडतंय. त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी व भविष्यात ते असलं काही करणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे, अशी मागणी मलिक यांनी केली.