जळगाव (प्रतिनिधी) डॉ. अविनाश आचार्य आणि संघाच्या प्रेरणेने केशवस्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रकल्प उभे झालेत. गरीब लोक येत नाहीत, मात्र मध्यम वर्गातील लोक वृद्धाश्रमात येतात. मुलगा, सून, आई – वडिलांना वागवत नाही. मुलांकडील पैसे, वैभव काय कामाचे, असा सवाल मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित केला. ते रविवारी मातोश्री आनंदाश्रम नवरचनेचा व गौराई आरोग्य उपचार केंद्र लोकार्पण सोहळ्यात उद्घाटक म्हणून बोलत होते. तर समाजाप्रती असलेल्या समर्पित भावनेतून या आनंदाश्रमाचे केशवस्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून व्यवस्थापन होत असून सुसज्ज व्यवस्था असलेला हा आनंदाश्रम ‘प्रेम आणि बंधूभाव’ या भक्कम पायावर. उभा राहीला आहे, अशोक भाऊ जैन यांच्या नवरचनेच्या ध्यासातून मातोश्री आनंदाश्रमाला एक नवीन रूप प्राप्त झाले. जनसेवेचे व्रत घेतलेल्या केशव स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून या वृद्धाश्रमाचे आनंदाश्रम झाले. केशवस्मृती प्रतिष्ठान माझ्या मतदार संघात असल्याचा मला सार्थ अभिमान असून त्यामुळे येथे आल्यावर ‘समाज आपला व आपण समाजाचे’ याची खऱ्या अर्थाने जाणीव होते. केशव स्मृती प्रतिष्ठान हे सामाजिक कार्याचे अधिष्ठान ठरत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.*
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंदाश्रमाच्या प्रकल्प प्रमुख अनिता कांकरिया यांनी केले. सूसंचालन संध्या कांकरिया यांनी तर आभार प्रदर्शन सुनील पाटील यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुरेश भोळे, दलूभाऊ जैन, जैन समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, केशवस्मृती सेवासंस्था समूहाचे प्रमुख भरत अमळकर, मातोश्री आनंदाश्रमाच्या प्रकल्प प्रमुख अनिता कांकरिया यांच्यासह केशवस्मृती सेवासंस्थाचे पदाधीकारीव सदस्य उपस्थित होते.
‘केशवस्मृती’ वर्षांनुवर्ष निरंतर सुरू !
ना. गिरीष महाजन पुढे म्हणाले की, मूकबधिर, गतीमंद मुलांचा सांभाळ करून त्यांना शिकवणे, वाढीस लावणे ही खूप मोठी जबाबदारी आहे. ‘केशवस्मृती’ वर्षांनुवर्ष निरंतर सुरू आहे. उपेक्षित आणि गरजू घटकांना आधार देणे अशा लोकाभिमुख उपक्रमांचाही केशवस्मृती विस्तार करताना दिसत आहे. अशा कामांसाठी आपल्या उत्पन्नातील काही वाटा खर्च करावा, यापेक्षा मोठे समाधान नाही.
!वृद्धांना दिली जाणारी सेवा कौतुकास्पद !
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, कोरोना काळात मदत करण्याची इच्छा असूनदेखील मदत करता येत नव्हती. त्याकाळी जैन परिवाराने पाच हजार लोकांना जेवण देण्याचे कार्य केले आहे. मुलांनी नाकारलेल्या आई वडिलांना समावून घेण्याचे काम मातोश्री आनंदाश्रम करत आहे. हे रोपटे कै. डॉ. अविनाश आचार्य यांनी लावले, याचे आज मोठ्या वटवृक्षात रुपांतर झाले. वृद्धाश्रमात अतिशय चांगल्याप्रकारे वृद्धांना सेवा मिळत असून कौतुकास्पद आहे. त्यांच्या निवासाची उत्तम सोय केली आहे हे केशव स्मृती प्रतिष्ठानाचे मोठे समाज कार्य असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
आनंदाश्रमाचे 75 टक्के काम पूर्ण !
अशोक जैन म्हणाले की, आनंदाश्रमाचे 75 टक्के काम पूर्ण झाले आहे. 25 टक्के काम महिनाभरात पूर्ण होईल. या ठिकाणी 100 आजी-आजोबा राहतील. त्यांचे जीवन या ठिकाणी सुखी व समाधानी राहील, अशी व्यवस्था व रचना आहे. मोठ्या भाऊंच्या शिकवणीतून जैन समूह सामाजिक उपक्रम राबविण्यात नेहमी पुढाकार घेता राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
आम्ही दहाजण मिळून डॉ. आचार्य !
भरत अमळकर म्हणाले की, आचार्य दादांनी काम करताना माणसांची टीम उभी केली होती. डॉ. आचार्य आज आपल्यात नाहीत, पण आम्ही दहाजण मिळून नक्की डॉ. आचार्य आहोत. समूहाच्या हातून दादांचे नाव खाली जाईल, अशी कृती झाली नाही आणि होणार नाही, सेवेतील ही माणसे दीपस्तंभासारखे आहेत.