मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. यावरून राज्यात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी यावर भाष्य केलं आहे. एकनाथ खडसे हे या चौकशांना सामोरे जाताना यंत्रणेला सहकार्य करत आहेत. त्यांनी काही केलं नाही त्यामुळे ते घाबरत नसल्याचं मलिक यांनी म्हटलं आहे.
ज्या प्रकरणात ईडी एकनाथ खडसे यांची चौकशी करत आहे त्याचाच आधार घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांचं खच्चीकरण केले होते. त्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीही झाली. आता ईडीच्या माध्यमातून सुडबुद्धीने व राजकीय हेतूने चौकशी सुरू असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. भाजपला वाटत असेल की, या यंत्रणांच्या माध्यमातून लोकांवर दबाव निर्माण करुन राजकीय गणितं बदलतील तर तो भाजपचा गैरसमज आहे. कुणीही या यंत्रणेला घाबरत नाही, असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे.
ईडी किंवा इतर यंत्रणेमार्फत कितीही चौकशा लावल्या तरी सत्य आज ना उद्या समोर येणार आहेच. एकनाथ खडसे हे या चौकशांना सामोरे जाताना यंत्रणेला सहकार्य करत आहेत. त्यांनी काही केलं नाही त्यामुळे ते घाबरत नाहीत, असं मलिक म्हणाले.
यंत्रणांचा दुरुपयोग करणं हे भाजपचं काम आहे. निव्वळ महाराष्ट्रच नव्हे तर पश्चिम बंगाल, युपी असतील तिथे विरोधकांना त्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचं काम या यंत्रणांच्या माध्यमातून होत आहे असंही नवाब मलिक म्हणाले.