मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने राज्य सरकारने गर्दी कमी करण्याकरिता निर्बंध कठोर केले आहेत. निर्बंधांमध्ये धार्मिक स्थळं आणि दारुच्या दुकानांचा उल्लेख नसला तरी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मात्र त्यासंबंधी इशारा दिला. गर्दी होत असेल तर दारूची दुकाने बंद केली जातील, असा इशारा आरोग्य टोपे यांनी दिला आहे.
धार्मिक स्थळांमध्ये गर्दी होत असेल तर त्याबाबही निर्णय घेवू. गर्दी होत असेल तर दारुची दुकानंही बंद करावी लागतील असा सूचक इशारा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला. राज्यात कोरोनाच्या रुग्णांत झपाट्यात वाढ होत असल्यानं नवे निर्बंध लागू करण्यात आलेत. राज्यात ऑक्सिजनची मागणी वाढून हॉस्पिटलमध्ये बेड कमी पडत नाही तोपर्यंत आणखी नवे निर्बंध लावले जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्याबाबत टोपे यांनी माहिती दिली. यामध्ये शाळाही बंद ठेवण्यात आल्यात मात्र दारुची दुकानं सुरु असल्यानं विरोधक टीका करत आहेत. त्यामुळं गर्दी होत असेल तर दारुची दुकानंही बंद करावी लागतील असा इशारा टोपे यांनी दिलाय.
त्याचबरोबर धार्मिक स्थळांमध्येही गर्दी होत असेल तर त्याबाबतही टप्प्याटप्यानं निर्णय घेण्यात येईल असं टोपे यांनी म्हटलं.राज्यात ऑक्सीजनची मागणी नगण्य वाढली असून दखल घेण्यासारखी ही मागणी नाही असही त्यांनी सांगितलं. १८ वर्षांवरील कोरोना झालेल्या मुलांना मधुमेह होण्याचा धोका वाढला असा अहवाल असला तरी icmr ने याबाबतीत सूचना कराव्या त्याची अंमलबजावणी केली जाईल असही ते म्हणाले. मुंबईतील कोविड सेंटरमध्ये पारदर्शकता नाही असा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय दरम्यान तक्रारीनंतर पारदर्शक चौकशी करून कारवाई केली जाईल असं ते म्हणाले.