
मुंबई प्रतिनिधी : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच 13 जून उलटला तरी मान्सूनने अपेक्षित गती पकडलेली नाही. परिणामी, राज्यातील अनेक भागांत पेरण्या रखडल्या असून शेतकरी चिंतेत आहेत.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना घाईघाईने पेरण्या न करण्याचे आवाहन केले आहे. विभागाकडून योग्य सूचना मिळेपर्यंत पेरणी टाळावी, असे सांगण्यात आले आहे. मात्र, काही भागांत शेतकऱ्यांनी आधीच पेरण्या सुरू केल्याचे चित्र दिसत आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात 15 जूननंतर मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत अनेक जिल्ह्यांत उष्णता आणि दमट वातावरण कायम राहणार आहे. विदर्भातील काही भागांसाठी उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून तापमान 42 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढला असताना महाराष्ट्र मात्र अद्याप पावसाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता 15 जूननंतरच्या मान्सूनच्या हालचालींकडे लागले आहे.
















