जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा हा कायदा व सुव्यस्थेसह राजकीय दृष्ट्या देखील संवेदनशील जिल्हा आहे. त्यामुळे सगळीकडून प्रेशर तर होते, मात्र लोकप्रतिनिधींसह सर्वांनी समजून घेतले. त्यामुळे कुठलाही निर्णय एकतर्फी घेतला नाही. १५ महिन्याच्या कार्यकाळात महसूल आणि पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील समन्वयामुळेच ५६ जणांवर केलेल्या एमपीडीएचा आकडा गाठता आला. हे संपुर्ण श्रेय पोलीस दलातील सहकाऱ्यांचे असल्याचे मत मावळते पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी व्यक्त केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांची सोलापूर शहर पोलीस आयुक्त म्हणून पदोन्नती झाल्याने त्यांचा निरोप समारंभ व जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचा स्वागत समारंभाचे जिल्हा पोलीस दलाकडून आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मावळते पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, नूतन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, एम. राजकुमार यांच्या पत्नी रमैय्या कन्नन उपस्थित होत्या. पुढे बोलतांना एम. राजकुमार म्हणाले की, पंधरा महिन्यात या जिल्ह्याने चांगल्या आठवणी दिल्या आहेत.
काम करतांना पोलीस दलातील सर्व अधिकाऱ्यांमुळे कुठलच टेन्शन नव्हत. नेहमी आपल्या सहकाऱ्यांच्या मागे उभ राहीले पाहिजे. एम. राजकुमार यांच्या कार्यकाळातील शेवटचा एमपीडीएच्या पंधरा दिवसांच्या प्रस्तावाचे कामकाज एका दिवसात पुर्ण करुन अबतक ५६ चा आकडा गाठू शकलो असल्याचे ते यावेळी म्हणाले. त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, कविता नेरकर, डीवायएसपी संदिप गावित, कृष्णकांत पिंगळे, कुणाल सोनवणे, अन्नपुर्णा सिंह, अभयसिंग देशमुख यांच्यासह अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डीवाएसपी ) संदिप गावित यांनी तर आभार पोउनि रेश्मा अवतारे यांनी मानले.
५६ एमपीडीए हे पोलीस दलाचे यश : जिल्हाधिकारी
पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी साम, दाम, दंड आणि भेदचा वापर करुन ५६ सराईत गुन्हेगारांवर केलेल्या एमपीडीएच्या कारवाई ही जिल्हा पोलीस दलाचे यश आहे. त्याचा परिणाम देखील समाजात चांगल्या पद्धतीने दिसून येत आहे. त्यामुळे गुन्हेगारीला देखील लगाम लागलेला आहे. घटनेच्या ठिकाणी सर्व काही झाल्यानंतर पोलीस येतात, याला जळगाव पोलीस दल अपवाद ठरले असून आतापर्यंत झालेल्या घटनेच्या ठिकाणी अवघ्या काही मिनिटातच पोलीस दाखल झाल्यामुळे पुढील अनर्थ टळले आहेत. पोलीस अधीक्षकांकडून शिकण्यासारखे भरपूर काही असून कार्यालयीन कामकाज करतांना इगो मुक्त प्रशासन आणि सेवा हे सर्वात महत्वाचा गुण मी त्यांच्याकडून शिकलो असल्याचे मत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केले.
अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील : डॉ. रेड्डी
पदभार घेतल्यानंतर स्वागत समारंभात बोलतांना नूतन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी म्हणाले की, एम. राजकुमार आणि आम्ही पोलीस दलात एकाच मागनि परिक्रमण केले असून सोबत ट्रेनिंग घेतल आहे. ज्याप्रमाणे याठिकाणी आलेल्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याची येथून बढती झाली आहे. त्याचप्रमाणे मी देखील याठिकाणाहून बढती घेईल असेही ते गमतीने म्हणाले, नूतन पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डींनी स्विकारला पदभार रविवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी मावळते पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडून दुपारी आपल्या पदाचा पदभार स्विकारला. कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ते दोघ अधिकाऱ्यांनी समारंभाला उपस्थिती दिली.