मुंबई (वृत्तसंस्था) राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्यास परवानगी दिल्यामुळे राजकीय वाद पेटण्याची चिन्ह आहे. भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी वाईन विक्रीच्या निर्णयावर जोरदार आक्षेप घेतला आहे. ‘महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा प्रकार खपवून घेणार नाही’ असा इशाराच फडणवीस यांनी दिला आहे.
राज्य सरकारच्या निर्णयाला भाजपाने तीव्र विरोध केला आहे. शेतकरी-कष्टकरी, गरिब, बारा-बलुतेदार अशा एकाही घटकाला राज्य सरकारने गेल्या दोन वर्षांच्या कोरोना कालखंडात मदत केली नाही, अशी टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सरकारचे प्राधान्य केवळ आणि केवळ दारूलाच, महाविकास आघाडीचे हे सरकार नेमके आहे तरी कुणाचे? असा सवाल उपस्थित करत देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेच्या ‘नशे’त धुंद सरकारने गरिबांना थोडी तरी मदत करावी, अशी मागणी केली आहे.
राज्यात पेट्रोल-डिझेलऐवजी दारू स्वस्त, दारूबंदी संपवून दारुविक्रीला परवानगी देण्यात आली आहे, महाराष्ट्रात नवीन दारूविक्री परवाने देण्याचा निर्णय घेतला गेला आहे, आणि आता थेट सुपर मार्केट, किराणा दुकानातून घरोघरी दारू अशी टीका करत महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.