
जळगाव (प्रतिनिधी) : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात शुक्रवारी महावितरणच्या यंत्रणेचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी खांब पडून व पुरात रोहित्रे पाण्यात गेल्याने वीजपुरवठा खंडित झाला. मात्र महावितरणच्या अभियंते, कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर परिश्रम करून वीजपुरवठा पूर्ववत केला. गांधली उपकेंद्रात पाणी शिरल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला.
जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यावर अनेक खोलगट भागात पुराचे पाणी जमा होऊ लागले. परिणामी महावितरणकडून अनेक ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून वीजपुरवठा बंद करण्यात आला. वीजवाहिन्यांवर झाडे कोसळल्याने काही ठिकाणी तारा तुटल्या आणि खांब वाकले. यामुळे धरणगाव विभागांतर्गत वरडी, मंगरूळ, गांधली, भरवस, जानवा, वावदे, पाचोरा विभागांतर्गत लासगाव, मुक्ताईनगर विभागांतर्गत निमखेडी, तळवेल, हरताळे, चांगदेव, घोडसगाव, रुईखेडा, सावदा विभागांतर्गत मंगरूळ, पाल, जळगाव विभागांतर्गत किनोद व भुसावळ विभागांतर्गत शेंदुर्णी या 17 उपकेंद्रांचा वीजपुरवठा ठप्प झाला.
बिघाडाची माहिती मिळताच महावितरणच्या अभियंते, कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी तातडीने हालचाली केल्या, अनेक ठिकाणी विद्युत खांबावरील डिस्क व पिन इन्सुलेटर फुटले होते. हे बिघाड शोधण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांनी चिखलातून पायपीट करून व उभ्या खांबावर प्रत्येक ठिकाणी चढ-उतर करून, बिघाड शोधून, त्या ठिकाणी नवीन डिस्क व पिन बदलून काम करून वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. पडलेले खांब व तुटलेल्या तारा जोडण्यात आल्या. तर काही ठिकाणी पूरपस्थितीमुळे कामात अडथळे आले. 17 पैकी 16 उपकेंद्रांचा वीजपुरवठा दुपारपर्यंत सुरळीत करण्यात आला. गांधली 33 केव्ही वाहिनी अंशत: सुरू करण्यात आली. मात्र उपकेंद्राच्या आवारात पाणी साचल्याने खबरदारीचा उपाय म्हणून वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला. गांधली गावानजीक पुराच्या पाण्याच्या प्रवाहामुळे एक विद्युत खांब पूर्णपणे पाणीपात्रात कोलमडलेला होता. त्यामुळे उपकेंद्राचा इन्कमर सुरू करण्यात अडचण होती. उपकेंद्रातील पाणीपातळी कमी होताच दुरुस्ती हाती घेण्यात येणार आहे. दरम्यान गलांगी उपकेंद्र येथून पर्यायी वीजपुरवठा घेऊन गांधली उपकेंद्रातील 11 केव्ही वाहिन्या सुरू करण्यात आल्या.
पारोळा तालुक्यात नदीनाल्यांना पूरपरिस्थितीमुळे काही गावात रोहित्रे पाण्यात बुडाल्यामुळे शेळवे, मेहुतेहू, बिचखेडा, उंदीरखेडा, शेवगे, मुंडाणे, तामसवाडी या 11 केव्ही वीजवाहिन्या सुरक्षेसाठी सकाळी बंद ठेवण्यात आल्या होत्या. परंतु पूराचा ओघ जसा जसा कमी होत आहे तसा तसा पेट्रोलिंग करून वाहिन्या चालू करण्यात आल्या. कळमसरे शाखेअंतर्गतही पुराळे निंब, बोहरा, शहापूर या गावठाण वाहिन्यांसह सर्व कृषी वाहिन्या सकाळी बंद होत्या. कळमसरे उपकेंद्राच्या आवारातही पाणी शिरल्याने सुरक्षेसाठी 11 केव्ही इनकमर काही वेळ बंद होता.
मुसळधार पाऊस व पूरस्थितीतही वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणकडून युद्धपातळीवर सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. वीजग्राहकांनी संयम बाळून सहकार्य करण्याचे आवाहन जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी केले आहे.
















