नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये काही प्रमाणात कमी आली असली तरी अद्याप परिस्थिती चिंताजनक आहे. गेल्या २४ तासांत देशात २ लाख ८१ हजार ३८६ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली असून ३ लाख ७८ हजार ७४१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. गेल्या २४ तासांत देशात ४ हजार १०६ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत दोन लाख ८१ हजार ३८६ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, तीन लाख ७८ हजार ७४१ जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. तर देशात याच कालावधीत ४ हजार १०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील मृतांची एकूण संख्या २ लाख ७४ हजार ३९० वर पोहोचली आहे.
राज्यातली स्थिती
राज्यात लॉकडाऊनचा परिणाम आता दिसायला लागला असून दिवसेंदिवस कोरोनाचा आलेख उतरणीला लागला आहे. राज्यात रविवारी नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. रविवारी तब्बल ५९ हजार ३१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे तर नवीन ३४ हजार ३८९ कोरोना रुग्णांची नोंद झाली. दरम्यान ९९४ कोरोना रुग्णांची मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आजपर्यंत राज्यातील ४८,२६,३७१ कोरोना रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ४ लाख ६८ हजार १०९ सक्रिय रुग्ण आहेत.
राज्ये व केंद्र शासित प्रदेशांना पुढील तीन दिवसांत ५१ लाख लस मात्रा देण्यात येणार असून त्यांच्याकडे अजून १.८४ कोटी मात्रा शिल्लक आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत २० कोटी लसमात्रा राज्यांना मोफत पुरवल्या आहेत. एकूण पुरवलेल्या लसमात्रांची संख्या २० कोटी २८ लाख ९ हजार २५० अशी आहे. १४ मे रोजी वाया गेलेली लस वगळता १८ कोटी ४३ लाख ६७ हजार ७७२ लस मात्रा वापरण्यात आल्या आहेत. अजून १ कोटी ८४ लाख ४१ हजार ४७८ लस मात्रा राज्यांकडे शिल्लक आहेत.