जळगाव (प्रतिनिधी) तुमच्या सासऱ्यांना समजवा, असे सांगून रक्षाताईंच्या माध्यमातून भाजपाकडून आपल्याला ब्लॅकमेलींग सुरू असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार एकनाथराव खडसे यांनी केला आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसच्या शरद पवार गटाची जिल्हा बैठक जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दि.१२ रोजी पक्ष कार्यालयात पार पडली. यावेळी ते बोलत होते. याबाबतचे वृत्त आज ‘पुण्य नगरी’ने दिले आहे.
खडसे पुढे म्हणाले की, ज्यांना मी मोठे केले ते आज माझ्यावरच बोलत आहेत. अनिल पाटील आणि गिरीश महाजन यांचे मंत्रीपदाचे आयुष्य फक्त चार महिन्यांचे आहे. मला पवार साहेबांच्या कृपेने जी आमदारकी मिळाली ती पाच वर्षांसाठी आहे. भाजपने माझा खूप छळ केला आहे. तसेच पक्षांतर केले तरी देखिल हा छळ सुरूच आहे. अनेक चौकशा माझ्या सुरू असल्याचे देखील ते म्हणाले. दरम्यान, बैठकीनंतर पत्रकार परिषदमध्ये भाजप प्रवेशाच्या चर्चावर खडसे म्हणाले, माझे नरेंद्र मोदी, जे. पी. नड्डा, राजनाथ सिंह, विनोद तावडे या नेत्यांशी चांगले संबंध आहेत. लपून-छपून भाजपत जाणार नाही. ईच्छा होईल तेव्हा गॉडफादरला विचारेल.
राजकीय अंधारात असताना शरद पवारांनी आमदार केले. कुठे जायचे असेल तर त्यांना विचारून जाईन. मला भाजपमध्ये येण्याचं आवाहन करायला खासदार रक्षा खडसे इतकी मोठी झालेली नाही. तसेच भाजपत जायचे असल्यास गिरीश महाजन यांचे नामोल्लेख टाळत त्यांच्या परवानगीची गरज नसल्याचे खडसे म्हणाले. भाजपकडून रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे यांना उमेदवारी नाकारण्यात येणार असल्याबाबत चर्चा आहेत. त्यांना भाजपने उमेदवारी न दिल्यास त्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार होवू शकतात का? असाही प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला. तेव्हा त्यांनी रक्षा खडसे राष्ट्रवादीत कदापिही येणार नाहीत. त्या भारतीय जनता पार्टीतच राहतील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे, माजी आ. अरूण पाटील, डॉ. बी. एस. पाटील, महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, महिला शहराध्यक्षा मंगला पाटील, सहकार विभागाचे जिल्हाध्यक्ष वाल्मिक पाटील, सोपान पाटील, नितीन तावडे, रमेश पाटील, यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, रायुकोंचे प्रदेश सरचिटणीस रमेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.