मुंबई (वृत्तसंस्था) स्वातंत्र्यवीर सावरकरांवर लिहिलेल्या एका पुस्तकाच्या प्रकाशनावेळी वीर सावरकरांबाबत अनेक मोठी आणि महत्त्वाची विधाने करण्यात आली आहे. स्वातंत्रवीर सावरकर हे मुस्लिमांचे शत्रू नव्हते. त्यांनी उर्दूमध्ये गझल लिहिल्यात. वीर सावरकरांबद्दल आजही चुकीची माहिती समाजात आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.
सावरकरांवर लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. कार्यक्रमाला संबोधित करताना मोहन भागवत यांनी सावरकरांबद्दल भाष्य करणाऱ्या विरोधी पक्षांना लक्ष्य केले. माहिती आयुक्त आणि माजी पत्रकार उदय माहूरकर यांच्या ‘वीर सावरकर: द मॅन हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन’ या पुस्तकाच्या उद्घाटन प्रसंगी भागवत बोलत होते.
“सावरकरांना बदनाम करण्याची मोहीम होती. स्वातंत्र्यानंतर ही मोहीम खूप वेगाने पुढे गेली. आत्ता, संघ आणि सावरकरांना लक्ष्य केले जात आहे. यानंतर स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती आणि योगी अरविंद यांचा क्रमांक आहे, कारण वीर सावरकरांप्रमाणे त्यांच्याबद्दलही चुकीची माहिती पसरली आहे. वीर सावरकर जे कोणी होते, ते या तिघांच्या विचारांनी प्रभावित झाले होते,” असे मोहन भागवत म्हणाले. जे भारतातील एकतेच्या विरोधात आहेत त्यांना सावरकर आवडत नाही. सावरकरांचा असा विश्वास होता की राष्ट्रीयत्व त्यांच्या उपासनेच्या आधारावर लोकांमध्ये भेदभाव करत नाही आणि ते हिंदू राष्ट्रीयत्व आहे. येथे प्रत्येकजण समान आहे, म्हणून विशेषाधिकारांबद्दल बोलू नका.”, असंही भागवत म्हणाले.
सावरकर मुस्लिमांचे शत्रू नव्हते आणि त्यांनी उर्दूमध्ये गझल लिहिली होती असेही मोहन भागवत म्हणाले. “मतभेद स्वाभाविक आहेत. जरी आपण वेगळे असलो तरी आपण एकत्र चालत राहू, वादविवाद होईल. हा आपल्या राष्ट्रीयत्वाचा मूलभूत घटक आहे. ज्यांना ते माहित नाही त्यांनी सावरकरांना बदनाम करण्याची मोहीम सुरू केली आहे.” “जेव्हा सावरकर तिथे होते, तेव्हा हिंदू समाज (मुस्लिमांना) म्हणायचा की कर्तव्यात तुमचाही वाटा आहे आणि जे काही आहे ते तुमचेही आहे. आम्ही एकमेकांचे भाऊ आहोत, पण पूजा व्यवस्था वेगळी आहे, पण आम्ही एक आहोत. प्रत्येकजण देशाचा आहे,” असे भागवत म्हणाले.