जळगाव (प्रतिनिधी) मराठी प्रतिष्ठानतर्फे ५०० फळझाडे लावण्याचा रानमेवा प्रकल्प दि. ०४ जुलै २०२१ रविवार रोजी सकाळी १० वाजता “चला रानमेवा चाखु या” या महत्त्वपूर्ण वृक्षारोपण प्रकल्पाचा शुभारंभ होणार आहे. मेहरूणची प्रसिद्ध गोड बोरे, रामफळ, सितापुळ, माळबेरी, खिरणी वा करवंद अशा विविध ५०० फळझाडांची लागवड जळगावकर जनतेच्या उपस्थितीत केली जाणार आहे.
मेहरूण तलावाच्या निसर्गरम्य परीसरात फळझाडांची लागवड केली जाणार आहे. अवघ्या तीन वर्षात जळगावकर जनतेला या फळझाडांवरील रानमेवा चाखता येणार आहे. मेहरूण तलाव परीसरात विविध पक्षी येतात त्यांना सुद्धा फळझाडांवरील फळांचा आस्वाद मनमुराद पणे कायमस्वरूपी चाखायला मिळावा हा सुद्धा हेतु आहे.
फळझाडांची लागवड लावण्याचा उद्देश मेहरुणची प्रसिद्ध बोरे कमी होत आहेत. नविन बोरांचे झाडे कोणी लावत नाही म्हणून मेहरूण बोरांचे संवर्धन व्हावे हा मुख्य उद्देश आहे. यासोबत रामफळ, सिताफळ, माळबेरी, खिरणी, करवंद या वनमेव्याच्या फळझाडांचे वृक्षारोपण केले जाणार आहे. फळझाडांची ५०० रोपे मराठी प्रतिष्ठानने विकत घेतली आहे. याकरीता अनेक वृक्षप्रेमी नागरीकांनी विशेष सहकार्य केले आहे.
फळझाडे लावण्यासाठी ट्रॅक्टर मशीनद्वारे पाच फुट खोल असे ५०० खड्डे अगोदरच करण्यात आले आहेत. त्यामध्ये विशिष्ट खते, माती टाकण्यात आली आहे. फळझाडांची व्यवस्थित निगराणी व्हावी याकरीता “पर्यावरण सेवक” ही संकल्पना राबविली जाणार असुन वृक्षप्रेमी नागरीकांना “फळ झाड दत्तक योजना जाहीर करण्यात येणार आहे. “चला रानमेवा चाखु या” या फळझाडे लागवड प्रकल्पाचे प्रमुख म्हणून वनश्री विजय वाणी, सचिव मराठी प्रतिष्ठान हे काम बघणार आहेत.
जळगाव शहरात अतिशय आगळ्यावेगळ्या वृक्षरोपणाची तयारी मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड. जमील देशपांडे, उपाध्यक्ष सतिष रावेरकर, महिला आघाडी अध्यक्ष अनुराधा रावेरकर, संध्या वाणी, निलोफर देशपांडे, विद्या चौधरी, प्राध्यापिका सविता नंदनवार यासह वृक्षप्रेमी व पर्यावरण प्रेमी नागरिक करीत आहेत.