अमळनेर (प्रतिनिधी) – शहरात गंभीर पाणीटंचाई निर्माण झालेली असताना नगरपालिका प्रशासन आणि सत्ताधारी मात्र निष्क्रिय असल्याचा आरोप माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी केला आहे. जनतेच्या जीवावर सत्ता मिळवून “दोन दिवसाआड पाणीपुरवठा” करण्याचे आश्वासन देणाऱ्या माजी आमदारांचे दावे पूर्णपणे फोल ठरल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
आमदार पाटील म्हणाले की, गेल्या दीड महिन्यांपासून शहरभर पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. अनेक वर्षांनंतर प्रथमच अमळनेरकरांना उन्हाळ्यात पाण्यासाठी व्याकूळ व्हावे लागत आहे. नागरिक नियमितपणे पाणीपट्टी भरत असताना देखील त्यांना दहा-दहा दिवस पाणी मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
“उन्हाळ्याची तीव्रता वाढलेली आहे. उष्माघातामुळे नागरिक त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना इकडे-तिकडे भटकंती करावी लागत आहे. शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णपणे कोलमडले असून टाक्या पुरेशा भरल्या जात नाहीत. दहा दिवसांआडही कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे,” अशी टीका त्यांनी केली.
जळोद डोहातील पाणी कमी झाल्यानंतर गंगापुरी डोहातून पाणी आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगत त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “त्यासाठी खर्च होत असेल तर आवर्तन का घेतले जात नाही? आवर्तनासाठी ४० लाख रुपये खर्च झाले तरी हरकत नाही. तो पैसा जनतेचाच आहे आणि जनतेला पाणी मिळाले पाहिजे. इतर कामे कमी करा, पण पाणीपुरवठा सुरळीत करा.”
पालिकेतील काही नगरसेवक स्वतःच्या भागात अधिक पाणी सोडून घेण्यासाठी पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांवर दबाव आणत असल्याच्या तक्रारीही आपल्याकडे आल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, शहरातील पाणीपुरवठा तातडीने सुरळीत न केल्यास शहर विकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही आमदार पाटील यांनी दिला.
२०० कोटींची पाणीपुरवठा योजना रखडल्याचा आरोप
अमळनेर शहराची पुढील ५० ते ६० वर्षांची पाण्याची गरज लक्षात घेऊन धरणावर आधारित सुमारे २०० कोटी रुपयांची “२४ बाय ७” पाणीपुरवठा योजना मंजूर करून तिचे काम सुरू करण्यात आले होते. शहरात पाइपलाइन टाकण्याचे कामही सुरू झाले होते. मात्र, सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या उदासीनतेमुळे ही योजना थंडबस्त्यात गेल्याचा आरोपही त्यांनी केला.
“मतदारसंघाचा पालक म्हणून मी स्वतः या योजनेकडे लक्ष घालणार असून लवकरच या कामाला गती मिळेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यात्रोत्सव नियोजनावरही टीका
बोरी पात्रातील पारंपरिक यात्रोत्सवाच्या नियोजनावरही आमदार पाटील यांनी टीका केली. “प्रथमच यात्रेत ठेकेदारी आणि वसुलीचा प्रयोग करण्यात आला. त्यामुळे बाहेरगावाहून आलेले विक्रेते आणि पाळणेवाले नाराज झाले असून संपूर्ण नियोजन कोलमडले,” असे ते म्हणाले.
तसेच, जनतेने निवडून दिलेल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना “बाहुले” बनवून ठेवण्यात आल्याची टीकाही त्यांनी केली. “लोकप्रतिनिधींना स्वतंत्रपणे काम करू दिले पाहिजे. नगराध्यक्षांनी कुणाचे बाहुले बनणे लोकशाहीला शोभणारे नाही,” असा सल्लाही त्यांनी दिला.













