मुंबई (वृत्तसंस्था) पंढरपूरच्या विठुरायाची यात्रा व आषाढी एकादशी दोन दिवसांनी येऊ घातली असताना राज्यातील तमाम वारकऱ्यांसाठी शासनाने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. महाराष्ट्र राज्यातील कीर्तनकार व वारकऱ्यांना सोयीसुविधा पुरवण्याकरिता ‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळ’ स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्या संदर्भातील सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय रविवारी जारी करण्यात आला. या महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर येथे असणार आहे.
राज्याला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा लाभली आहे. महाराष्ट्रातील गावागावांतून भाविक वारकरी दरवर्षी वारीला जातात. वारीमध्ये प्रामुख्याने कामकरी, कष्टकरी, शेतकऱ्यांचा समावेश असतो. परंतु कालारूप दिंड्यांची संख्या वाढल्याने वारीच्या व्यवस्थापनाचे सूक्ष्म नियोजन महत्त्वाचे ठरले आहे. याकरिता वारकरी महामंडळाची संकल्पना आली असून, राज्य मंत्रिमंडळाच्या ११ जुलै २०२४ रोजी झालेला बैठकीत ‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळ’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेकडो वर्षांपासून पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची पायी दिंडीच्या माध्यमातून वारी करण्याची पवित्र परंपरा महाराष्ट्रात आहे.
तीर्थक्षेत्रांचा विकास, कीर्तनकार, वारकऱ्यांना अन्न, सुरक्षा, वैद्यकीय मदत, विमा कवच, पायाभूत सुविधा इत्यादी सोयीसुविधा पुरवण्याकरिता व कल्याणकारी योजना राबवण्याकरिता वारकरी महामंडळ कार्य करेल. त्यामध्ये प्रामुख्याने वारकरी संप्रदायाच्या अडीअडचणी, प्रश्न सोडवणे, सर्व पालखी सोहळा मार्गाची सुधारणा करणे, वारकरी भजनी मंडळाला भजन व कीर्तन साहित्याकरिता अनुदान देणे, पंढरपूर, देहू, आळंदी, मुक्ताईनगर, सासवड, पिंपळनेर, त्र्यंबकेश्वर, पैठण, कोल्हापूर, शेगाव, तारकेश्वर, भगवानगड, अगस्ती ऋषी, संत सावता माळी समाज मंदिर अरण तालुका माढा, जिल्हा सोलापूर व इतरही तीर्थक्षेत्रांचा विकास या महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्याचबरोबर चंद्रभागा, इंद्रायणी, गोदावरी व इतर नद्या प्रदूषणमुक्त करण्याबाबतचीदेखील उपाययोजना महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.