मुक्ताईनगर (प्रतिनिधी) बऱ्हाणपूर मार्गावर तीन दुचाकींमध्ये झालेल्या विचित्र अपघातात पूर्णा येथील दोघे तरुण ठार झाले आहेत. तर चार जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेमुळे पुर्णाड गावात शोककळा पसरली आहे. तर जखमींमध्ये पातोंडी व चांगदेव येथील प्रवाशांचा समावेश आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड येथील दीपक अशोक इंगळे यांनी आत्महत्या केल्यामुळे त्यांना मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले होते. त्यांना पाहून पूर्णाड गावाकडे परतत जाताना रोहित मुकेश गाढे आणि प्रदीप छगन वाघ यांची दुचाकी व समोरून येणाऱ्या येणाऱ्या कमलेश सुभाष पाटोळे, लीलाबाई सुभाष पाटोळे, मनीषा सुभाष पाटोळे यांच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. तर त्या पाठोपाठ येणाऱ्या दोन दुचाकी ही या गाड्यांवर आदळल्यामुळे झालेल्या विचित्र अपघातात पुर्णाड येथील रोहित मुकेश गाढे (वय १९) व प्रदीप छगन वाघ (वय २८) या दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला आहे. तर अशोक गंगाराम सावळे हे गंभीर जखमी झालेले आहेत. तसेच चांगदेव येथील कमलेश पाटोळे, मनीषा पाटोळे व लीलाबाई त्याचप्रमाणे रावेर तालुक्यातील पातोंडी येथील अशोक गंगाराम सावळे हे गंभीर जखमी झालेले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच आ. चंद्रकांत पाटील यांनी तत्काळ उपजिल्हा रुग्णालय गाठले. जखमींवर प्रथमोपचार करून त्यांना तत्काळ जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी आमदारांनी रवाना केले. तसेच राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा अॅड. रोहिणीताई खडसे यांनी देखील मुक्ताईनगरचे उपजिल्हा रुग्णालय गाठून जखमी रुग्णांची भेट घेतली. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक तसेच नागरिकांनी मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. पोलीस निरीक्षक नागेश मोहिते आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी ही उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली. या अपघातात दोघांच्या मृत्यूमुळे पूर्णाड गावावर शोककळा पसरली आहे.