नागपूर (वृत्तसंस्था) पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फारुखनगरातून शनिवारी दुपारी बेपत्ता झालेल्या तिघा चिमुकल्यांचा रविवारी एका नादुरुस्त कारमध्ये दुपारी मृतदेह आढळून आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली. घरासमोर खेळत असताना कारमध्ये बसून खेळण्याचा मोह न आवरल्याने तिघेही या नादुरुस्त कारमध्ये बसले आणि अचानक कारचा दरवाजा आतून लॉक झाला. यामुळे कारमधील दूषित हवा, उष्माघातामुळे गुदमरून बेशुद्ध पडलेल्या तिघांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तौफीक फिरोज खान (४), आलिया फिरोज खान (६) आणि आफरीन इरशाद खान (६), अशी या चिमुकल्यांची नावे आहेत. यातील तौफीक आणि आलिया हे सख्खे बहीण-भाऊ आहे.
नेमकं काय घडलं !
फारुखनगरच्या मोहम्मदिया मशिदीजवळ फिरोज खान हे कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. तो मोलमजुरी करीत होता. त्यांना तौफीक व आलिया ही दोन मुले आहेत. तर इरशाद खान यांना आफरीन नावाची मुलगी आहे. तिघं नेहमीप्रमाणे शनिवारी घरासमोर खेळत होते. तर कडाक्याचे उन्ह असल्यामुळे त्यांची माता घरकामात व्यस्त होत्या. परंतू रात्रीचे सात वाजले तरी मुले घरी न आल्यामुळे कुटुंबातील सदस्य आणि परिसरातील नागरिकांनी शोधाशोध सुरू केली. रात्री बराच उशीर होऊनही तिघं बालकांचा काहीही तपास लागत नव्हता. अगदी फारुखनगर, बाबा बुद्धाजीनगर, वैशालीनगर, टेका नवीन वस्ती, महेंद्रनगर येथे त्यांचा शोध घेतला, पण मुले सापडली नाही. शेवटी या प्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात तिन्ही चिमुकल्यांच्या बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपासकार्य हाती घेतले.
पोलिसांकडून तपासाला सुरुवात !
पोलिसांनी तातडीने शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना, रेल्वेस्टेशन, बस स्थानक, नियंत्रण कक्ष आदी ठिकाणी संदेश पाठवले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासने सुरु केले. आजूबाजूच्या रहिवाशांची चौकशी सुरू केली, पण घरासमोरील गल्लीतून ही मुले बाहेर गेले नसल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील सर्व घरं, गल्लीबोळ, विहीर आणि गच्चीसह सर्व ठिकाणी पाहणी केली. परंतू काहीही तपास लागला नाही.
श्वान पथकही अपयशी !
तपास लागत नसल्यामुळे पोलिसांनी शेवटी श्वान पथकाला पाचरण केले. पहिल्याने मुलांच्या घरापासून सुरुवात पण तो आजूबाजूलाच घुटमळत राहिला. दुपारी २ वाजेच्या सुमारास आणखी एका श्वानाला आणण्यात आले पण तोसुद्धा घरापासून काही अंतरावर उभ्या असलेल्या एका नादुरुस्त कारपर्यंत गेला आणि परत आला. त्यामुळं मुले नेमकी गेली कुठे, हा प्रश्न पोलिसांसह सर्वांना बुचकळ्यात टाकू लागला. अख्खी पाचपावली, शांतीनगर पोलीस यंत्रणा या चिमुकल्यांच्या शोधार्थ कामी लागली होती.
महिला पोलिसाला कारमधून आली दुर्गंधी !
रविवारी दुपारी एक महिला पोलीस परिसरात चिमुकल्यांचा शोध घेत होती. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कारजवळून जाताना तिला काहीतरी सडल्याची दुर्गंधी आली. तिला संशय आल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली. तत्काळ एक ताफा कारजवळ दाखल झाला. कार आतून लॉक होती. पोलिसांनी कारच्या काचातून आत बघितले असता त्यांना जबर धक्का बसला. कारमध्ये तिघं चिमुकले बेशुद्ध अवस्थेत पडून होती. कारचा दरवाजा उघडताच प्रचंड दुर्गंधी यायला लागली. कारण कारमध्ये चिमुकल्यांचा मृत्यू झाला होता आणि मृतदेह सडण्यास सुरुवात झाली होती.
चिमुकल्यांचे मृतदेह पाहून आई-वडिलांनी फोडला हंबरडा !
रोज घरासमोर खेळून, धिंगाणा घालणाऱ्या चिमुकल्यांचे अचानक मृतदेह पाहून दोन्ही मातापित्यांनी हंबरडा फोडला. शेजारी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करीत होता. तर पोलिसही त्यांना सावरण्याचा प्रयत्न करीत होते. पण चिमुकल्यांचे मृतदेह बघून आई-वडील काळीज चिरणारा आक्रोश करत होते. यामुळे उपस्थितांच्या डोळ्यातही पाणी आले होते.
कारमधील दूषित हवा, उष्माघातमुळे गुदमरून मृत्यू !
शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास हे तिघेही घरासमोर खेळता खेळता काही अंतरावर हातमाग कारखान्यासमोर उभ्या असलेल्या एमएच १९/ बीजे ८१७४ क्रमांकाच्या फोर्ड इको स्पोर्ट कंपनीच्या कारकडे गेले. कारमध्ये बसून खेळण्याचा मोह त्यांना आवरला नसावा. कारचा दरवाजा उघडल्यानंतर तिघेही कारमध्ये बसले आणि कारचा दरवाजा ओढून घेताच आतून लॉक झाला. काही महिन्यांपासून बंद असलेल्या या कारमधील दमट वातावरण आणि भीषण गर्मीमुळे तिघेही बेशुद्ध पडले असल्याचा अंदाज आहे. कारच्या काचांवर प्रचंड धूळ जमलेली असल्याने आतील काहीच दिसत नव्हते. चिमुकल्यांनी आवाज देण्याचा प्रयत्नही केला असेल, पण दुपारची वेळ, सर्वत्र सानसून आणि कूलरच्या आवाजांमुळे कोणाच्याही काहीच लक्षात आले नाही आणि आवाजही आला नसावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली.
कारचा दरवाजा ‘फॉल्टी’
एमएच १९ बीजे ८१७४ या कारमध्ये मृतदेह आढळले. या कारचा दरवाजा खराब होता व आतून लॉक केल्यावर लवकर उघडत नव्हता, असे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. लहान मुले अनेकदा परिसरातील ऑटोच्या आत जाऊन खेळायचे. तसेच ते या कारमध्ये गेल्याची शक्यता आहे. मुलांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनाच्या अहवालातून समोर येईल, अशी माहिती पोलिस उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांनी दिली.