मुंबई (वृत्तसंस्था) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरुन राज्याचं राजकारण जोरदार तापलेलं आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याप्रकरणावर काय बोलणार याकडेही सर्वांचं लक्ष लागून होतं. मला काही बोलायचं नाही. मी त्याला फारसं महत्व देत नाही. त्यांच्या पद्धतीने आणि त्यांच्या संस्काराप्रमाणे बोलतात, अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिली आहे.
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी काल महाड येथे जन आशीर्वाद यात्रेदरम्यान आयोजित पत्रकारपरिषदेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना केलेल्या खळबळजनक वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील यावर अगदी मोजक्याच शब्दात माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “मला काही बोलायचं नाही. मी त्याला फारसं महत्व देत नाही. त्यांच्या पद्धतीने त्यांच्या संस्काराप्रमाणे बोलतात.” अशा शब्दात शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राजकारणाचा नाही तर काही लोकांचा स्तर खाली गेला – जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणाचा नाही तर काही लोकांचा स्तर खाली गेला आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे. “नारायण राणे यांचे वक्तव्य निषेधार्ह आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असं बोलणं हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. अशी भाषा राजकारणात यापूर्वी कधीही कुणी वापरलेली नाही. नरेंद्र मोदींनी कसे सहकारी निवडले आहेत याची छोटीशी चुणूक नारायण राणे यांच्या वक्तव्यावरुन राज्याला व देशाला कळली,” असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.