पुणे (वृत्तसंस्था) भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरून विधानसभा मतदारासंघाचे आमदार चंद्रकांत पाटील पुन्हा एका नव्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. “नरेंद्र मोदी यांनी सर्व मुस्लिमांना प्राधान्य दिलं. त्यांनी एपीजे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं. ते काय मुस्लीम होते म्हणून त्यांना बाजूला ठेवलं नाही. एक कर्तुत्ववान म्हणून, एक संशोधक म्हणून त्यांना राष्ट्रपती केलं,” असा दावा पाटील यांनी भाजपाच्या कार्यक्रमात केला आहे.
भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने तरुणाईला जोडण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या युवा वॉरियर्स अभियानाचा शुभारंभ चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुण्यात झाला. त्यावेळी ते बोलत होते. मुस्लीम महिलांच्या पायात बेड्या होत्या. त्या तोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिहेरी तलाकचा कायदा केला. बिहारमध्ये निवडणुकांत जो विजय मिळाला त्याचं विश्लेषण करा. रांगेनं मुस्लीम महिलांनी मोदींना मतदान केलं. आमच्या पायातील बेडी तुम्ही तोडली. नाही तर आमचा पती तलाक म्हणून आम्हाला बाहेर काढायचा. तुम्ही कायदा केला असं तेथील महिला म्हणत होत्या. बिहारमध्ये मुस्लीम बहुल भागात २९ पैकी १४ जागांवर भाजपला विजय मिळाला. तर मुस्लीम महिलांनीही आपल्या पतीला सांगितलं तुम्हाला जे काही करायचं ते करा आम्ही मोदींनाच मतदान करणार आहोत, असं पाटील यांनी नमूद केलं.
“छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, अटलबिहारी वाजपेयी आदी महापुरुषांचे कर्तृत्व या युवापिढीला समजून घेण्याची गरज आहे. आज समाजात आजूबाजूला अनेक अडचणी, प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी आपण काय योगदान देऊ शकतो, याचा विचार युवांनी केला पाहिजे. १८ ते २५ या वयोगटातील तरुणाईचे सळसळते रक्त असते. त्याला योग्य दिशा देऊन राष्ट्रहितासाठी ही शक्ती कार्यान्वित करायला हवी. स्वातंत्र्य लढ्यात युवकांचे मोठे योगदान होते. तसेच योगदान आजही या तरुणाईने द्यायला हवे. या पिढीला खरा इतिहास सांगण्याची तसेच राष्ट्राशी, इतिहासाशी आणि संस्कृतीशी जोडण्याचे काम युवा मोर्चा करत आहे,” असं पाटील म्हणाले.