जळगाव (प्रतिनिधी) नशिराबाद नगर परिषदेचे सफाई कामगार विशाल गोपी चिरावांडे यांच्या मृत्यू प्रकरणाची दखल प्रशासनाने घेतली असून मयताच्या वारसांना एम. एस. ई.बी. च्या माध्यमातून १० लाखांची मदत मिळवून दिली जाईल,असे आश्वासन देत या मृत्यू प्रकरणाची गंभीर दखल प्रशासनाने घेतल्याचे जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांचे निवेदन स्वीकारताना सांगितले.
नशिराबाद सफाई कामगार मृत्यू प्रकरणी श्री. मुकुंद सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र जनमोर्चा संघटनेच्या शिष्मंडळाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची आज शुक्रवारी भेट घेत त्यांना मागण्यांचे निवेदन दिले, त्या प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी सफाई कामगार चिरावंडे यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या शेत मालक सोपान वाणी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले.
जनमोर्चा संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सफाई कामगार विशाल चिरावंडे हा सोपान वाणी यांच्या शेता लगतची गटार साफ करीत असताना शेतात सोडण्यात आलेल्या वीज प्रवाहामुळे शॉक लागून ५ सप्टेंबर रोजी जागीच मृत पावला. शेत मालक सोपान वाणी याने शेता लगतची तुंबलेली गटार साफ करण्यात यावी असा अर्ज नशिराबाद नगर पंचायती कडे केला होता. अर्ज केल्यानुसार पंचायतीचे स्वछता मुकादम है सफाई कामगार विशाल चिरवंडे यांच्या सोबत गेले, त्या वेळी मुकादम सोपान वाणी यांना म्हणाले, गटारीत विजेच्या वायरी सोडलेल्या दिसत आहे, वीज प्रवाह गटारीत सोडलेला तर नाही ना? असा प्रश्न केला असता, वाणी यांनी सांगितले वीज प्रवाह बंद केलेला आहे, निर्धास्त रहा व गटार साफ करा. त्यामुळे सफाई कामगार गटार साफ करण्यासाठी गटारीत फावडा टाकताच विजेचा जबरदस्त शॉक लागून चीरावंडे जागीच मरण पावले.
शेतमालक वाणी यांच्या बेजबाबदार व निष्काळजी पणामुळे एक तरुण सफाई कामगार बळी गेला आहे.त्याच्या मृत्यूस सर्वस्वी वाणीच जबाबदार असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यासह अट्रोसीटीचा गुन्हा देखिल दखल करण्यात यावा. तसेच वीज मंडळाचे अभियंते व कर्मचारी देखिल तेवढेच जबाबदार असून त्यांच्यावर ही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावें. मयताच्या वारसांना ५० लाखांची आर्थिक मदत तातडीने मिळावी. मयत कामगार कर्तव्य बजावत असताना मयत झाल्याने त्याच्या पत्नीस नशिराबाद नगरपंचायतीने कायम स्वरुपी नोकरी द्यावी.
या आमच्या मांगण्या असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, अन्यथा आम्हाला जन आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे. या वेळी शिष्टमंडळात पहुर चे हरिष धंजे गुरुजी,रमेश सोनावणे,कैलास जाधव, दिलीप सपकाळे,राजू मोरे, चंदन बिऱ्हाड, वाल्मीक सपकाळे, मनोहर लोखंडे, सोमा भालेराव, विनोद चिरावंडे, जयेश मरदाने आदि उपस्थित होते.