जळगाव (प्रतिनिधी) नाथाभाऊ मजबूत माणूस आहे. ईडी माझ्या मागे लागली म्हणून माझा चेहरा पण पडणारा नाही. तुम्ही कितीही छळ करा, मी झुकणार किंवा घाबरणार नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी पुन्हा भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीच्या निमित्ताने पक्ष कार्यालयात आयोजित बैठकीत खडसे बोलत होते. नाथाभाऊने पक्ष बदलला म्हणून तुम्ही कितीही छळ करा, हा काही पहिल्यांदा घडलेला प्रकार नाही. मी आता स्वतः अशी मानसिकता करून घेतली आहे की जे होईल ते होईल. मी काही केलेले नाही, म्हणून काय होईल ते पाहू. नाथाभाऊ मजबूत माणूस आहे. तुम्हाला किती बदनाम करायचे तितके करा, पण मी काही झुकणारा किंवा घाबरणारा नाही. ईडी माझ्या मागे लागली म्हणजे माझा चेहरा पण पडणारा नाही. ‘चलते रहना’ अशीच माझी मानसिकता. यांनी कितीही बदनामी केली तरी नाथाभाऊ कसा आहे, हे जनतेला ४० वर्षांत माहिती नाही का? ‘जाहिल यू ही बदनाम है, हमको गम से क्या काम है, ये मुस्कुराती जिंदगी जिंदादिली का नाम है’, असा शेर बोलून दाखवून खडसेंनी भाजपला टोला लगावला.
ज्याने भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहार केला आहे, त्याला कायद्याने शिक्षा व्हायलाच हवी, या मताचा मी आहे. पण ज्या माणसाच्या चार वेळा चौकश्या झाल्या, सीबीआय, इन्कम टॅक्सने केलेल्या चौकशीत काहीही तथ्य निघाले नाही. तरी नंतर अशा पद्धतीने छळणे योग्य नाही. हे निव्वळ राजकारण आहे, हे महाराष्ट्राची जनता जाणून आहे. विरोधकांना काय वाटेल ते वाटेल पण ‘मी पुन्हा येईल’, असे म्हणत खडसेंनी फडणवीसांचे नाव न घेता त्यांना चिमटा काढला. मी थांबणाऱ्यांमधला नाही. ४० वर्षांच्या राजकीय जीवनात अनेक चढउतार पाहिले आहेत, असे सांगत त्यांनी ‘चलते रहो, रुक जाना नही, तू कही हारके, काटो मे चलके मिलेंगे रास्ते बहार के’, हा शेर म्हटला.