जळगाव (प्रतिनिधी) ”एकनाथराव खडसे यांनी कोरोनावरून आज दिलेली प्रतिक्रिया ही त्यांच्या सडक्या मनोवृत्तीचे दर्शन घडविणारी आहे. मात्र मी त्या बद्दल बोलणार नाही, ते माझे संस्कार नाहीत. मात्र नाथाभाऊंचे आता डोके फिरले असून त्यांना ईश्वर सदबुध्दी देवोत”, अशा शब्दांत भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे (Eknath Khadse) यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यात सध्या चांगेलच वाकयुद्ध रंगले आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. एकनाथ खडसे यांना कोरोना झालेला होता त्यावेळी गिरीश महाजन यांनी ईडी अटक करणार असल्याच्या भीतीने खडसे यांना कोरोना झाल्याचा आरोप केला होता. आता गिरीश महाजन यांनी कोरोना झाल्याचे जाहीर करताच खडसे यांनी त्याचे उट्टे काढत पोलिसांच्या अटकेच्या भीतीने महाजन यांना कोरोना झाला ,असा टोला लगावला, त्यावर महाजन यांनी खडसे यांना ठाण्याच्या हॉस्पिटल मध्ये दाखवावे, अशी टीका केली. त्यावर खडसे यांनी ”गिरीशभाऊ यांना पुण्याच्या बुधवार पेठेत दाखवावे,” असा टोला लगावला.
यावर महाजन म्हणाले, ”एकनाथराव खडसे यांनी कोरोनावरून आज दिलेली प्रतिक्रिया ही त्यांच्या सडक्या मनोवृत्तीचे दर्शन घडविणारी आहे. मात्र मी त्या बद्दल बोलणार नाही, ते माझे संस्कार नाहीत. मात्र नाथाभाऊंचे आता डोके फिरले असून त्यांना ईश्वर सदबुध्दी देवोत” महाजन सध्या होम क्वारटाईन आहेत.
माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, मला कोरोना झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी काल खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली होती. यानंतर त्यांनी आज विकृतीचा कळस गाठून अतिशय खालच्या स्तरावरून कॉमेंट केली आहे. खरं तर नाथाभाऊ यांचा स्वभाव आणि आजवरचा लौकीक पाहता ही प्रतिक्रिया तशी आश्चर्यकारक नाही. मात्र ही प्रतिक्रिया त्यांचे मानसिक संतुलन ढळल्याचे सिध्द करणारी ठरली आहे. मला या संदर्भामध्ये काहीही बोलायचं नाही. आता कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळण्याची त्यांना हौस आलेली आहे. मात्र हे त्यांचे फ्रस्टेशन आहे. सत्तेचा कोणता तरी तुकडा भेटेल म्हणून पक्षांतर केल्यानंतरही त्यांच्या पदरात काहीच पडलेले नाही,”
”त्यांच्याकडे कुठलेही पद नसल्या कारणाने ते सध्या रिकामे आहे त्यामुळे त्यांना असे उपद्व्याप सुचत आहे त्यांची ही भाषा निश्चितच शोभनीय नाही, कुठलेही त्यांच्याकडे काम नसल्याकारणाने आता फक्त फुशारका मारण्याच्या पलीकडे ते काहीही करू शकले नाही. ‘आम्ही हे केलं, आम्ही ते केलं,’ अशा फुशारका मारण्याशिवाय ते काही करणार नाही. या नैराश्यातूनच त्यांना आता हे विधान केले आहे. मात्र ते कितीही विकृत पातळीवर उतरले तरी आम्ही आमचे संस्कार सोडणार नाहीत. गेट वेल सून…या विकृतीतून लवकर बाहेर यावे यासाठी आपल्याला शुभेच्छा..”अशा शब्दांमध्ये महाजन यांनी शालजोडीतले मारून एकनाथराव खडसे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.