धरणगाव (प्रतिनिधी) कारागृहात असतांनाही ज्या धरणगावातून माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना मताधिक्क्य मिळाले होते. त्याच धरणगावात लोकसभेच्या निमित्ताने उबाठा गटाकडून आखल्या जाणाऱ्या विधानसभेच्या रणनीतीने राष्ट्रवादी शरद पवार गट अस्वस्थ झाला असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यावरील नेत्यांच्या आदेशानेच धरणगावात राष्ट्रवादीसोबत ‘माइड गेम’ खेळला जात असल्याचेही बोलले जात आहे.
लोकसभा निवडणुकीचे वातावरण आता तापायला सुरुवात झाली आहे. जळगाव लोकसभा मतदार संघात ठाकरे गट आणि भाजपकडून जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे. परंतू धरणगावात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. धरणगावात प्रचार यंत्रणा राबविताना स्थानिक ‘उबाठा’ गटाकडून आघाडीतील महत्वपूर्ण पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत मोठी खेळी खेळत असल्याची चर्चा आहे. प्रचारात गुलाबराव देवकर यांचे समर्थक पर्यायी राष्ट्रवादीच्या महत्वाच्या व्यक्तींना मुद्दाम डावलून धरणगावात राष्ट्रवादीची ताकदच उरलेली नाही, असे चित्र रंगवले जात आहे. आतापासून राष्ट्रवादीला मानसिक आणि राजकीय दृष्ट्या कमकुवत केले तर विधानसभेच्या वेळी गुलाबराव देवकर यांच्या हाती ‘तुतारी’ ऐवजी ‘मशाल’ देण्याची रणनीतीवर काम सुरु असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.
माजी खासदार उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे असलेला चाळीसगाव मतदार संघ मशालकडे येणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. तर चाळीसगावची जागा ठाकरे गटाला मिळणार असल्यामुळे जळगाव ग्रामीणची जागा राष्ट्रवादीकडेच राहील, यावर देखील शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा होती. परंतू ठाकरे गट मात्र, ही जागा आपल्याकडेच राहावी म्हणून प्रयत्न करतोय. त्याचाच एक भाग म्हणून लोकसभेच्या निमित्ताने विधानसभेची राजकीय रणनीतीवर काम सुरु असल्याची चर्चा आहे. त्यात राष्ट्रवादीला प्रचारात दुय्यमस्थान देणे, देवकरांच्या समर्थकांना हेतुपुरस्कर डावलणे. थोडक्यात धरणगावातील राष्ट्रवादीचे अस्तित्वच नसल्याचे चित्र तयार करणे. जेणे करून विधानसभा लागल्यावार ठाकरे गटाला जळगाव ग्रामीणच्या जागेवर दावा करता येईल किंवा देवकरांना हाती मशाल घेण्यास भाग पाडता येईल. राष्ट्रवादीच्या तुलनेत राष्ट्रीय कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना जास्तीचे झुकते माप देऊन एकप्रकारे देवकर गटाला डिवचले जात असल्याचीही भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
काही जण तर खाजगीत देवकरांनी हाती मशाल घेतली तर नौका पार होईल, अन्यथा काही खरे नाही असेही बोलत आहेत. त्यामुळे धरणगावसह जळगाव ग्रामीण मतदार संघात मतदारांमध्ये वेगळाच संदेश जात आहे. किंबहुना असे बोलून एक वेगळेच चित्र रंगवले जात आहे. उघड-उघड सुरु असलेल्या या खेळीमुळे देवकर गटाचे मानसिक खच्चीकरण केले जात असल्याचीही भावना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. अर्थात या विषयवार कुणी उघडपणे बोलत नसले तरी, राष्ट्रवादी शरद पवार गट अस्वस्थ असल्याची मात्र, जोरदार चर्चा धरणगावात रंगली आहे. दरम्यान, लोकसभेच्या निमित्ताने विधानसभेसाठी सुरु असलेल्या रणनीतीला राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर हे कशा पद्धतीने उत्तर देतात, हे तर आगामी काळातच स्पष्ट होईल.