धरणगाव (प्रतिनिधी) विशेष पोलीस निरीक्षकांचे पथक येण्याची शक्यता असल्याची बातमी मिळताच कालपासून गावातील दोन नंबरवाल्यांनी आपआपले धंदे बंद ठेवले आहेत. परंतू चक्क आयजींचे पथक येण्याची गुप्त बातमी कुणी फोडली? असा, प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसापासून नाशिक रेंजचे शहरात विशेष पोलीस निरीक्षक श्री. दिघावकर यांनी गुटखा मुक्त रेंज करणार असल्याचे आपल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. तशात चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी गुटखा प्रकरण उघडकीस आणल्यानंतर एका सहाय्यक पोलीस निरीक्षकासह सात पोलीस कर्मचारी निलंबित झाले होते. तर दुसरीकडे एकनाथराव खडसे यांनी देखील बोरखेडा येथील हत्याकांडानंतर अवैधधंद्यांच्या मुद्द्यावर बोट ठेवले होते.
धरणगावातही मोठ्या प्रमाणात गुटख्याची आयात-निर्यात होते. तर आयजींचे पथक गावात येण्याची कुणकुण लागताच गावातील सट्टापेढीवाल्यांनी आपापल्या एजंटांना फोन करून आयजीचे पथक गावात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुकान बंद ठेवायचं आणि चोरून लपून धंदा घ्यायचा, असा निरोप दिला. दरम्यान, विशेष पोलीस निरीक्षक श्री. दिघावकर आणि पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे हे शिस्तप्रिय आहेत. तरी देखील गुप्त बातमी दोन नंबरवाल्यांपर्यंत कशी पोहचली?, असा प्रश्न सुज्ञ नागरिक विचारात आहेत. दुसरीकडे गावात दोन नंबरचे धंदे दोन दिवस नव्हे तर कायमस्वरूपी बंद व्हावेत, अशी मागणी होत आहे.