मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र हे मॅग्नेटिक राज्य आहे. महाराष्ट्र राज्यातले उद्योग कुणी परराज्यात घेऊन जाऊ शकत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नाव न घेता टोला लगावला आहे. दरम्यान, उत्तर योगी आदित्यनाथ यांनी मिशन बॉलिवूड हाती घेतल्याची चर्चा आहे. तर काँग्रेसने योगींवर थेट आरोप करत भाजपला टार्गेट केले आहे.
उद्योजकांना आजही महाराष्ट्राचे आकर्षण कायम आहे, असे सांगतानाच राज्यातील कोणतेही उद्योग बाहेर जाणार नाहीत तर इतर राज्यातील उद्योजकही महाराष्ट्रात उद्योगासाठी येतील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. इंडियन मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबईची ओळख असलेला सिनेउद्योग म्हणजेच बॉलिवूड यूपीत नेण्याच्या उद्देशानं योगींचा हा दौरा असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी योगीच्या दौऱ्यावर टीका केली आहे. भाजपच्या पाच वर्षांच्या काळात दिवसाढवळ्या महाराष्ट्रातील अनेक उद्योग अन् कार्यालये गुजरातला पळवण्यात आली. आता महाराष्ट्रातले सरकार बदलले तर उत्तर प्रदेशच्या नावाखाली बॉलिवूडचे लचके तोडण्याची पटकथा तयार झालेली दिसते. पण भाजपच्या काळात जे झालं ते आम्ही पुन्हा घडू देणार नाही, असं अशोक चव्हाण यांनी ठणकावले आहे. महाराष्ट्रात नवीन गुंतवणूक येते आहे. इंडियन मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्स महाराष्ट्रातील या बदलाचे ११३ वर्षे जुने साक्षीदार आहे. त्यामुळेच तुम्हीच महाराष्ट्राचे ब्रँड अॅम्बेसेडर आहात. महाराष्ट्राच्या यशाची गाथा, गोष्टी तुम्हीच इतरांना सांगू शकता. कुठलीही अडचण असेल, तर ती दूर करण्यात सरकार तुमच्यासोबत असते. हे तुम्हाला सांगता येईल. यामुळे महाराष्ट्रात देशभरातून नव्हे परदेशातून येणाऱ्या गुंतवणुकीलाही प्रोत्साहन मिळेल. यासाठी तुम्ही महाराष्ट्राचे दूत व्हावे, अशी अपेक्षा ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.
इंडियन मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्सला ११३ वर्ष झाली आहेत या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जुन्या आठवणींना उजळा दिला. ते म्हणाले, इंडियन मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्ससोबत जुने स्नेहबंध आहेत. यापूर्वी मुंबई आणि महाराष्ट्राचे व्हिजन काय असेल, याबाबत आपण चर्चा करत असू. पण आता हे स्वप्न आपल्याला सत्यात आणण्याची संधी मिळाली आहे. संस्थेने स्वातंत्र्यांच्या आधीचा काळही बघितला आहे. आता युग बदलले आहे. देशही बदलला आहे. देश विकासाच्या दिशेने पुढे जात आहे आणि याबरोबरच आपले नाते अधिक घट्ट झाले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.