नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशामध्ये कोरोनाच्या दुसरी लाट ओसरत असल्याचा दिलासा देशवासियांना मिळत असतानाच पुन्हा एकदा धडकी भरवणारी बातमी समोर आली आहे. देशात तिसऱ्या लाटेची सुरुवात ऑगस्ट महिन्यात म्हणजेच याच महिन्यामध्ये होऊ शकते असा दावा एका अहवालामधून समोर आला आहे. या लाटेमध्ये दिवसाला एक लाखांहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळून येतील अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
हैदराबाद आणि कानपूरमधील भारतीय प्रौद्योगिक संस्था म्हणजेच आयआयटीमध्ये मथुकुमल्ली विद्यासागर आणि मनिंद्र अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या संशोधनानंतरच्या अहवालात हे दावे करण्यात आले आहेत. ऑक्टोबर महिन्यामध्येच तिसऱ्या लाटेतील रुग्णसंख्येचा उच्चांक दिसून येईल अशी शक्यताही व्यक्त करण्यात आलीय. ब्लुमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार विद्यासागर यांनी एका ईमेलच्या माध्यमातून ही माहिती दिलीय. केरळ आणि महाराष्ट्रामधील परिस्थिती पुन्हा चिंताजनक होऊ शकते असंही विद्यासागर म्हणाले असून ही या राज्यांसाठी धोक्याची घंटा असल्याचं सांगण्यात येत आहे. कोरोनाची तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेइतकी घातक नसेल असंही सांगितलं जात आहे.
याच वर्षी मे महिन्यात आयआयटी हैदराबादमधील प्राध्यापक विद्यासागर यांनी भारतामधील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता मॅथमॅटिकल मॉडलच्या आधारावर मे महिन्यामध्ये रुग्णसंख्येचा उच्चांक पहायला मिळेल असे म्हटले होते. इंग्रजी वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार विद्यासागर यांनी मे महिन्यामध्ये रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला जाईल आणि आकडेवारी पाहता जूनच्या शेवटापर्यंत दिवसाला २० हजार कोरोना रुग्ण आढळून येतील असेही विद्यासागर त्यावेळेस म्हणाले होते. मात्र विद्यासागर यांच्या टीमचा अंदाज चुकला होता.